योगाचा वैज्ञानिक वारसा जपणारी संस्था .कैवल्यधाम योग संस्थेचा ११० वा स्थापना दिवस उत्साहात साजरा .सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती
लोनावळा:योग म्हणजे सर्वांशी जोडून राहण्याचा आणि अंतःकरण एकत्र ठेवण्याचा मार्ग हा खरा राजयोग आहे, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी योगाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. लोणावळ्यातील निसर्गरम्य वातावरणात कैवल्यधाम योग संस्थेचा ११० वा स्थापना दिन उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत आणि परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर माजी केंद्रीय मंत्री व कैवल्यधाम शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, तसेच अनुसंधान अधिकारी डॉ. रणजीतसिंग भोगल यांची उपस्थिती होती. शांतिपाठ आणि दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सांगता सन्मान आणि चिंतनाने झाली.

कैवल्यधाम योग संस्था ही केवळ योगशिक्षण केंद्र नाही, तर योगाचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारे एक अद्वितीय प्रयोगशाळा आहे. १९२४ मध्ये स्वामी कुवलयानंद यांनी ही संस्था स्थापन केली, त्या काळात योगाला केवळ धार्मिक वा अध्यात्मिक साधना मानले जात होते. परंतु स्वामीजींनी योगाला विज्ञानाच्या कसोटीस उतरवले प्रयोग, संशोधन आणि शास्त्रीय विश्लेषण यांच्या माध्यमातून योगाचे सामाजिक आणि आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले.

आज, शतक उलटूनही, कैवल्यधाम ही परंपरा जपते आहे. योगशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि शरीरविज्ञान यांच्या एकत्र अभ्यासातून “योगाचे विज्ञान” जगासमोर आणण्याचे हे केंद्र बनले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या कार्याला सलाम करत म्हटले, “योग आणि विज्ञान या दोन्ही अनुभवाधारित आहेत. मन, बुद्धी आणि शरीर यांच्यात संतुलन निर्माण करणारी ही जीवनपद्धती समाजाला एकसूत्री बनवते.

कार्यक्रमात बोलताना स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज म्हणाले, “व्यक्ती क्षणभंगुर असते, पण संस्था कायम राहतात. सत्ता आणि प्रसिद्धी क्षणिक असते, पण योग मन स्थिर ठेवतो.” त्यांचा हा संदेश कैवल्यधामच्या कार्याला अधोरेखित करणारा होता कारण ही संस्था व्यक्तीपेक्षा विचाराला, आणि विचारापेक्षा अनुभवाला अग्रक्रम देते.
या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कैवल्यधामच्या शताब्दी वर्षातील उपक्रमांचा आढावा सादर केला. सरसंघचालक भागवत यांनी संस्थेच्या सांदिपनी ग्रंथालय, शास्त्रीय अनुसंधान विभाग, स्वामी कुवलयानंद समाधी स्थळ, गोशाळा, कैवल्य संग्रहालय, विद्या निकेतन शाळा आणि गोवर्धनदास सेक्सरिया योग महाविद्यालय यांना भेट देऊन विविध प्रकल्पांची माहिती घेतली.

डॉ. रितु प्रसाद लिखित “सात्विक आहार” आणि डॉ. शरदचंद्र भालेकर लिखित “योगमय पोलिस” या पुस्तकांच्या हिंदी आवृत्तींचे अनावरणही भागवत यांच्या हस्ते झाले.
आज जगभर योगाचा प्रसार होत असताना, कैवल्यधामसारख्या संस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. कारण त्या फक्त योग शिकवत नाहीत, तर योग समजावतात — त्यामागील शास्त्र, त्याची मानसशास्त्रीय आणि सामाजिक उपयुक्तता स्पष्ट करतात. हेच कैवल्यधामचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच ती संस्था “योगाचा वैज्ञानिक वारसा” जपणारी आणि पुढे नेणारी ठरते.
कार्यक्रमाच्या शेवटी सरसंघचालक भागवत यांनी स्थानिक स्वयंसेवकांना संबोधित करत योगाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेचा आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गोवर्धनदास सेक्सरिया योग महाविद्यालयातील एम.ए. योगशास्त्र विभागातील विद्यार्थिनी शनया वात्सायन हिने केले.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




