
कुसगाव खुर्द परिसरात तीन शेळ्या गायब; बिबट्याच्या हालचालींची भीती वाढली
कामशेत : कुसगाव खुर्द परिसरात शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळी पाचच्या दरम्यान विनायक दत्तू लालगुडेंनी आपल्या शेळ्यांचा कळप चराईसाठी डोंगर पायथ्याशी नेला होता. नियमितप्रमाणे तेथून परतताना मात्र तीन शेळ्या परत न आल्याचे त्यांच्या लक्षात आले. उर्वरित दहा शेळ्या मात्र सुरक्षित घरी आणण्यात आल्या.


गावकऱ्यांनी या परिसरात काही विचित्र आवाज ऐकला असल्याचे सांगत आहे, बिबट्या किंवा इतर एखाद्या वन्यप्राण्याने हल्ला केला असावा, असा अंदाज वर्तवला आहे. चरनारी जनावरे अचानक पळू लागल्याचे काहींनी पाहिले. त्यामुळे वन्यप्राण्याची उपस्थिती असल्याचा संशय अधिक बळावला आहे.


याबाबत माहिती मिळताच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश लालगुडे आणि अन्य स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. वनअधिकाऱ्यांचे पथकं लगेच घटनास्थळी पोहोचली आणि परिसराची पाहणी केली. मात्र घनदाट झाडी, तसेच अंधार पडण्याच्या वेळेमुळे शोधमोहीम राबवणे अवघड झाले असल्याचे प्राथमिक माहितीवरून सांगण्यात आले.


वनविभागाचे अधिकारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, परिसरात बिबट्याच्या हालचालींबाबत आधीपासूनच अधून-मधून माहिती मिळत असते. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी सावधगिरी पाळणे अत्यंत गरजेचे आहे. रात्रीच्या किंवा संध्याकाळी उशिराच्या वेळी जनावरे चरायला नेऊ नयेत, तसेच गटाने चराई करावी, लहान मुलांवर लक्ष ठेवावे. एकट्याने फिरणे टाळावे. गरज असल्यास मोबाईलचा आवाज करत बाहेर पडावे. गाय म्हैस शेळी व अन्य पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना वनविभागाचे आवाहन
वनविभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, कुसगाव–कामशेत परिसरात शेळ्या-जनावरे चराईसाठी नेताना विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. कोणतीही अस्वाभाविक हालचाल, पावलांचे ठसे, शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज किंवा वन्यप्राण्याची चाहूल लागल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.
गायब झालेल्या शेळ्या मिळाल्यास पुढील शासकीय प्रक्रिया करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















