
भारताच्या शूरवीर कन्यांनी गाजवला विश्वविजयाचा डंका
मुंबई, दि. २ नोव्हेंबर : डीवाय पाटील स्टेडियम काल साक्षीदार ठरलं एका ऐतिहासिक क्षणाचं भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या अदम्य जिद्दीने, संघभावनेने आणि पराक्रमाने आयसीसी महिला विश्वचषक-२०२५ जिंकत संपूर्ण देशाचं डोकं अभिमानानं उंच केलं.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने ५२ धावांनी दणदणीत विजय मिळवत “विश्वविजेता” पद पटकावलं. सकाळच्या मंद गार वाऱ्यात जेव्हा नाणेफेक झाली, तेव्हा नशीब दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने होतं, पण सामना जसजसा पुढे सरकत गेला, तसतसं मैदानावर रंग भरू लागले ते भारतीय पराक्रमाचे.
भारताकडून सलामीला उतरलेल्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने सुरुवातीला शांत पण ठाम खेळ सादर केला. स्मृतीने ५८ चेंडूत ४५ धावा करत संघाला मजबूत पाया दिला. तिच्या साथीने शेफाली वर्माने झंझावाती खेळाची मालिका उघडली. तिच्या ७८ चेंडूतल्या ८७ धावा म्हणजे फटाक्यांची आतषबाजीच वाटत होती प्रत्येक चौकारासोबत संपूर्ण स्टेडियम “भारत माता की जय” च्या घोषणांनी दुमदुमलं.


भारतीय संघाने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा करत आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे टिकता आलं नाही. लॉरा वोल्वार्डने एकटीने शतक झळकावत झुंजार लढा दिला, पण दीप्ती शर्मा, राधा यादव, अमनज्योत कौर यांच्या किफायतशीर आणि हुशार गोलंदाजीपुढे आफ्रिकन संघ अखेरीस २४६ धावांवर गारद झाला.


अंतिम क्षणी जेव्हा हरमनप्रीत कौरच्या संघाने विजयाचा झेंडा फडकवला, तेव्हा संपूर्ण मैदानात भारतीय तिरंगा लहरला आणि खेळाडूंच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू चमकले.
हा विजय फक्त एका संघाचा नव्हे हा भारतातील प्रत्येक मुलीचा विजय आहे, जी स्वप्न पाहते, लढते आणि जिंकते. भारतीय महिला क्रिकेटच्या सुवर्णपानात कालचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















