मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाचे आयोजन
कामशेत : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाचे आयोजन सोमवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आमदार शेळके मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
या अभियानाची सुरुवात सकाळी १० वाजता टाकवे बुद्रुक (भैरवनाथ मंदिर) येथे होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता फळणे (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), दुपारी १२ वाजता राजपुरी (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), दुपारी २ वाजता भोयरे (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर) तर दुपारी ३ वाजता पाथरगाव (दत्त मंदिर) येथे जनसंवाद अभियानाचे कार्यक्रम होणार आहेत.
आमदार शेळके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या गावातील समस्या लेखी स्वरूपात अर्जाद्वारे मांडाव्यात. सदर अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाला तातडीने निर्देश दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानाबाबत बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले :> “नागरिकांच्या अडचणी दूर करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक लक्ष देत असून रस्ते, गटारी, नाले, व्यायामशाळा, वीज समस्या तसेच इतर विकासात्मक कामांबाबत येणाऱ्या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील.”
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणे व थेट संवादातून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या गावातील अपेक्षा, प्रश्न आणि विकासाच्या संधींबाबत थेट आमदारांशी संवाद साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (९९२१८०७०११)



















