यवत येथे डी.जे. मुक्त गणेश मिरवणूकपारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप – मुस्लिम बांधवांनी फेडला नवस
यवत : विशेष प्रतिनिधी
यवत येथे यंदा प्रथमच डीजे-मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ढोल, ताशा, लेझीम आणि पारंपरिक खेळांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यवत परिसरात गणेशोत्सव काळात देखील शांततेचे वातावरण राखले गेले. दहा दिवस चाललेल्या उत्सवानंतर रविवारी उत्साहात विसर्जन सोहळा पार पडला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात गावोगावच्या तसेच मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
डीजेशिवायही उत्साह ओसंडून वाहिला
यंदा विसर्जन मिरवणुकीत डीजेला बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मिरवणुकीचा उत्साह कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र वास्तवात गणेशभक्तांचा उत्साह अबाधित राहिला. ढोल-ताशांच्या निनादात, लेझीमच्या तालावर आणि पारंपरिक खेळांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुका अधिक रंगतदार ठरल्या. डीजेच्या कर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांचा गजर ऐकायला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दिवसभर मिरवणुका
दिवसभर अनेक मंडळांनी आपापल्या गणपतीचे विसर्जन केले. कदमआळी मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ, कानिफनाथ मित्र मंडळ, महालक्ष्मी मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ आदी मंडळांच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या.
रात्री श्री नूतन तरुण मंडळाच्या मिरवणुकीत अमर तरुण मंडळ, बाप्पा मोरया मित्र मंडळ, शिवशंभू मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, राजा शिवछत्रपती मित्र मंडळ व नवदीप तरुण मंडळ या सहा मंडळांनी सहभाग घेतला. तसेच श्रीनाथ मित्र मंडळाच्या मिरवणुकीत त्रिमूर्ती मित्र मंडळ व गणेश मित्र मंडळ सहभागी झाले. सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन रात्री सुमारे १०.३० वाजता करण्यात आले.
नूतन तरुण मंडळाचा ‘नवसाला पावणारा गणपती’
यवत येथील श्री नूतन तरुण मंडळाचा गणपती हा “नवसाला पावणारा गणपती” म्हणून ओळखला जातो. यावर्षी या मंडळाच्या गणपतीपुढे यवत येथील मुस्लिम समाजातील मोहम्मद हुसेन यांनी केलेला नवस पूर्ण झाला. मोगल कुटुंबीयांनी गणपतीला हार, नारळ व प्रसाद अर्पण करून नवस फेडला. गणपतीपुढे मुस्लिम बांधव श्रद्धेने सहभागी झाल्याने सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन यवतकरांना घडले.



















