मातृशक्तीच्या नेतृत्वात एकजुटीचा जागर: तळेगावातील संमेलनातून संस्कृतीसंरक्षणाचा संदेश
तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर वस्तीमध्ये पार पडलेले ‘विशाल हिंदू संमेलन’ हे केवळ धार्मिक वा सामाजिक आयोजन नव्हते; ते समाजमनाला आत्मपरीक्षणाची आणि आत्मजागृतीची हाक देणारे व्यासपीठ ठरले. विशेष म्हणजे या संमेलनात डॉ. लीना कवितके यांनी मांडलेले विचार केंद्रस्थानी राहिले. हिंदू समाजाच्या एकजुटीचा संकल्प जरी कार्यक्रमाचा गाभा असला, तरी त्याला दिशा देणारे नेतृत्व मातृशक्तीच्या स्वरूपात पुढे आले, ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.
ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर प्रांगणात झालेल्या या संमेलनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा वातावरणात उत्साहाची लय निर्माण करून गेली. घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मात्र केवळ उत्सवी आविष्कारावर न थांबता समाजभान जागविण्याचा प्रयत्न वक्त्यांनी केला.
हभप श्री नथुराम महाराज जगताप यांनी परंपरा आणि धर्मसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर श्री अविनाशजी पवळे यांनी सामाजिक समरसता, स्वदेशी, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि कुटुंबव्यवस्थेचे जतन या ‘पंचमूल्यां’वर भर दिला. परंतु या सर्व विचारांना संवेदनशील अधिष्ठान देणारे भाष्य डॉ. लीना कवितके यांचे ठरले.
डॉ. कवितके यांनी स्पष्टपणे सांगितले की, समाजबांधणीची खरी पायाभरणी कुटुंबात होते आणि त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू म्हणजे मातृशक्ती. मुलींना शिक्षण, संस्कार आणि स्वाभिमानाची जाणीव दिल्यास त्या भविष्यातील जिजाऊ घडू शकतात, असा आशय त्यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले आणि उमाबाई दाभाडे यांसारख्या ऐतिहासिक स्त्री व्यक्तिमत्त्वांचा दाखला देत त्यांनी स्त्रीशक्तीच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. परंपरा जपत आधुनिकतेशी सुसंवाद साधण्याची आवश्यकता त्यांनी मांडली; अंधानुकरण नव्हे, तर विवेकपूर्ण स्वीकार हा समाजाचा मार्ग असावा, असा संदेश त्यांनी दिला.
संमेलनास ५०० ते ६०० नागरिकांची उपस्थिती लाभली, तर ‘गृहसंवाद मोहिमे’द्वारे १३२० कुटुंबांपर्यंत पोहोचल्याचा दावा आयोजकांनी केला. ही केवळ संख्येची नोंद नसून समाजातील संवाद वाढविण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणावे लागेल.
एकूणच, तळेगावातील हे संमेलन उत्सवापेक्षा अधिक आशयघन ठरले. समाजएकजुटीचा नारा देताना कुटुंबसंस्थेची आणि स्त्रीशक्तीची भूमिका अधोरेखित झाली, ही त्याची जमेची बाजू. भविष्यात या संकल्पांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर झाले, तरच या ‘जाज्वल्यजागारा’ला खरा अर्थ प्राप्त होईल.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११























