तळेगाव एमआयडीसी फेज १-२ हा रस्ता आठ वर्षापासून कागदावरच. या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. नवलाख उंब्रे च्या भैरवनाथ मंदिरात सभेच्या आयोजन
नवलाख उंब्रे : तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील नवलाखउंब्रे ते बधलवाडी दरम्यानच्या MIDC फेज १ ते फेज २ जोडरस्त्याच्या अभावामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या मार्गाच्या कामासंदर्भात प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता नवलाख उंब्रे येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात महत्त्वपूर्ण सभा आयोजित केली आहे.
या बैठकीत MIDC बंद, उपोषण, रास्ता रोको यांसारख्या तीव्र आंदोलनांचा निर्णय घेण्यात येणार असून यापुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ ऑगस्टपासून तळेगाव दाभाडे MIDC बंद करण्याचा व MIDC पोलीस ठाण्याजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा या बैठकीत दिला जाणार आहे.
जोपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.या रस्त्याच्या संदर्भात माहिती देताना मावळ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दत्तात्रय पडवळ म्हणाले की ९०० मीटरचा हा रस्ता नसल्याने नवलाख उंब्रे, बधलवाडी, आंबी, मंगरूळ, जाधववाडी, मिंडेवाडी आणि कदमवाडी येथील नागरिक, तसेच MIDCतील कामगार आणि वाहनचालक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.
सकाळी व सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होत असून अनेक वेळा दोन-दोन तास वाहतूक ठप्प होते. गेल्या काही वर्षांत या मार्गावर अपघातात १५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या बैठकीसाठी माजी सभापती निवृत्ती शेटे, उद्योजक रामदास काकडे, माजी उपसभापती शांताराम कदम, दत्तात्रय पडवळ, नवनाथ पडवळ, पांडुरंग कोयते, संतोष नरवडे, देविदास पडवळ, रवींद्र कडलक, संतोष उडाफे, रामदास लालगुडे, पंडित दहातोंडे, संदीप शेटे, रवी बधाले, दत्तात्रय कदम, जालिंदर शेटे, सरपंच अलका बधाले आदींनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















