पवनानगर : शिवणे येथे संत तुकाराम विद्यालयाला मॅकवर्ड्स कंपनीच्या CSR निधीतून दोन वर्गखोल्यांची भेट
पवनानगर (प्रतिनिधी) : शिवणे (ता. मावळ) येथील श्री. संत तुकाराम विद्यालय येथे मॅकवर्ड्स कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या दोन नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये भर घालण्याच्या उद्देशाने कंपनीने हा उपक्रम राबवला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा टप्पा महत्वाचा ठरणार आहे.
या सोहळ्याला इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, शालेय समितीचे अध्यक्ष संदीप काकडे, युवराज काकडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे माजी अध्यक्ष कमलेश कारले, श्रीशैल मेहंते, दीपक शहा, विलास जाधव, भालचंद्र लेले, विकास उभे, संजय साने, मॅकवर्ड्स कंपनीचे मॅनेजर विशाल नार्वेकर, हेमंत काळे, विनिता लास्कर, अनिकेत भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच माजी सभापती एकनाथ टिळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत शिंदे, माजी सरपंच विलास टिळे यांच्यासह ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या वेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले,
“शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे. हे लक्षात घेऊन मॅकवर्ड्स कंपनीने ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांना हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळेल.”
वर्गखोल्या म्हणजे आशेचे प्रतीक – कमलेश कारले
रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कमलेश कारले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “या वर्गखोल्या केवळ इमारती नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी त्या आशा, संधी आणि भविष्य घडविण्याचे प्रतीक आहेत.”
CSR उपक्रम शिक्षणासाठी – विशाल नार्वेकर
मॅकवर्ड्स कंपनीचे मॅनेजर विशाल नार्वेकर यांनी सांगितले की, “हा उपक्रम फोसेकोच्या शैक्षणिक विकास मोहिमेचा एक भाग आहे. शिक्षणात प्रवेश वाढवणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता करून देणे हेच आमचे ध्येय आहे.”
समारंभाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक रविंद्र शेळके यांनी केले. सूत्रसंचालन रामदास टिळे यांनी तर आभार प्रदर्शन शालेय समितीचे अध्यक्ष संदीप काकडे यांनी मानले.
ग्रामीण भागातील शिक्षणासाठी मोठे पाऊल
या दोन वर्गखोल्यांच्या उभारणीमुळे शिवणे परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतील. शाळेतील गर्दी कमी होऊन शिकवणुकीचे वातावरण अधिक गुणवत्तापूर्ण बनेल. ग्रामस्थांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.



















