
कामशेत पवना चौक बसस्थानक झाले टायर डेपो.गॅरेजवाल्यांचा उच्छाद प्रशासन ठप्प
कामशेत : पवना चौकातील बसस्थानकावर स्थानिक गॅरेजवाल्यांनी केलेल्या उघड उघड अतिक्रमणामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला प्रचंड धोका निर्माण झाला असून, प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे झोपी गेलेय. बसथांब्यावर टायरांची राशी रचून सार्वजनिक जागेचे खासगीत रूपांतर करणाऱ्या बेकायदा कारभाराला आता स्थानिकांनी जोरदार विरोध सुरू केला आहे.


या अतिक्रमणामुळे प्रवाशांना बसण्याजोगी जागा देखील उरलेली नाही. शेडमध्ये कचरा, टायर आणि गॅरेजच्या साहित्याचा पसारा असल्याने बसथांब्याचा मूळ उपयोगच संपुष्टात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली ही सुविधा आज बेकायदा धंद्याची बळी ठरली आहे, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.


नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गॅरेजवाल्यांचे मनोबल अधिकच वाढले आहे. बसस्थानक सार्वजनिक ठिकाण असूनही त्यावर खासगी मालकी हक्क गाजवणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल का? हा प्रश्न कायम आहे.


पवना चौक परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाला इशारा दिला आहे — “बसथांबा मुक्त करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू. आता तरी स्थानिक प्रशासन जागे होऊन अतिक्रमण हटवते का, की टायरांच्या ढिगाऱ्याखाली नागरिकांचा जीव अडकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















