मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचा उपक्रम
“संवाद जनतेशी, वार्तालाप पत्रकारांशी” पवन मावळ पूर्व भागातून शुभारंभ
मावळ : मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मावळवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी “संवाद जनतेशी, वार्तालाप पत्रकारांशी” हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पवन मावळ पूर्व भागात करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष विशाल विकारी, सचिव रामदास वाडेकर व प्रकल्पप्रमुख गणेश विनोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून, त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांच्या समस्या शासन दरबारी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे या संवाद मालिकेची सुरुवात पवन मावळ पूर्व भागातील नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाच्या रिंग रोड व टी.पी. प्लॅन या प्रश्नांपासून होणार आहे.
नागरिक हैराण, प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत
साळुंब्रे, सांगावडे, धामणे, गहुंजे, गोडुंब्रे, दारुंब्रे या भागातील नागरिक रिंग रोड व टी.पी. प्लॅनच्या प्रश्नामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. शासन दरबारी वारंवार पाठपुरावा, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठका झाल्यानंतरही प्रश्न सुटलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघाच्या वतीने नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेण्याचा आणि त्या अधिक ठळकपणे पुढे मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नागरिकांना थेट संवादाचे आवाहन
संघाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “आपल्या गावात येणाऱ्या पत्रकार बांधवांशी मनमोकळेपणाने संवाद साधा. आपल्या दृष्टीने अन्यायकारक असलेल्या समस्या व अडचणी स्पष्टपणे मांडा. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपले सहकार्य द्या.”
संघाचे नियोजन व मार्गदर्शन
या उपक्रमासाठी संघाचे सल्लागार सुरेश साखवळकर, सोनबा गोपाळे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, रमेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर उपाध्यक्ष आमिन खान, भारत काळे, खजिनदार संकेत जगताप, कायदेशीर सल्लागार किशोर ढोरे, कार्यकारी सदस्य सचिन शिंदे, ज्ञानेश्वर ठाकर, चैत्राली राजापूरकर, मुकुंद परंडवाल, पदसिद्ध सदस्य विशाल पाडाळे, अतुल पवार, रेश्माताई फडतरे, चेतन वाघमारे, रवी ठाकर, रमेश कांबळे यांच्यासह सर्व सभासद सक्रिय सहभाग घेत आहेत.
लोकहिताचा नवा प्रयत्न
“संवाद जनतेशी, वार्तालाप पत्रकारांशी” हा उपक्रम मावळातील लोकहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी पत्रकार संघाने हाती घेतलेली एक महत्त्वपूर्ण सामाजिक जबाबदारी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या उपक्रमातून स्थानिक समस्यांना गती मिळून त्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



















