लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाऊंडच्या वेढा. शिवप्रेमी मध्ये नाराजी
तळेगाव दाभाडे : शिवशाहीचा इतिहास लाभलेले आणि स्वराज्याचे वैभव असलेले लोहगड आणि विसापूर किल्ले सध्या तारेच्या कंपाउंडच्या वेढ्यात अडकले आहे. त्यामुळे त्वरित यावर कारवाई करून ऐतसिक वारशाचे जतन करावे अशी मागणी लोहगड विसापूर विकास मंच यांच्यावतीने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना पत्रकाद्वारे केली करण्यात आली आहे. जागतिक वारसा यादीत नुकतेच समाविष्ट झालेल्या लोहगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक शिवप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी, या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची संपत्ती ठेवली होती, मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तहात हे गड मोघलांना देण्यात आले होते, पेशव्यांनी येथे संपत्ती ठेवली होती. आज हेच गड स्वकीयांच्या तारेच्या विळख्यात अडकत आहेत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.परिसरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, जंगलतोड, आणि अनियंत्रित पर्यटनामुळे जैवविविधतेचा समतोल ढासळतो आहे. डीईएस पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक व केंद्रीय पर्यावरण मूल्यांकन समितीचे तज्ञ डॉ. राहुल रमेश मुंगीकर यांनी यावर गंभीर इशारा दिला आहे.
“लोहगड परिसरात पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती, सरीसृप, पक्षी आणि जीवजंतू आढळतात. परंतु अनियंत्रित विकास आणि पर्यटनामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गड पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी करून पर्यटन व्यवसाय सुरू केल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अनेक ठिकाणी जंगल तोडून ‘डेव्हलपमेंट झोन’ तयार केले जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
यावर लक्ष वेधत टेकवडे म्हणाले, “आज पायथ्याशी कंपाउंड आला, उद्या एखाद्याने किल्ल्यावरच दावा केला तर काय? शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास शिवप्रेमी मावळे तारेच्या मोगली विळख्याला फोडण्यासाठी रस्त्यावर उतरतील. लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या खालील प्रमाणे.
(१).गड परिसरातील अतिक्रमणांची तातडीने मोजणी करावी.
(२)जंगल क्षेत्राचे ड्रोनद्वारे परीक्षण
(३)किल्ले परिसर नो डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित करणे
(४)जैवविविधतेच्या संवर्धनासाठी विशेष योजना राबवणे
या मागण्यांना मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, मार्गदर्शक संदीप गाडे, सदस्य सचिन निंबाळकर, गणेश उंडे, अनिकेत आंबेकर, बसाप्पा भंडारी, अमोल गोरे, अजय मयेकर, अमोल मोरे, चेतन जोशी, संदीप भालेकर, ओंकार मेढी, सिद्धांत जाधव यांनीही पाठिंबा दिला आहे.
या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे संरक्षण ही केवळ एका भागाची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पावले उचलावीत अशी मागणी देखील केली आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















