
विकासाच्या सावलीत जगणारे अंधारलेले वास्तव. पवनानगर जवळील मालेवाडीचा अस्वस्थ करणारा संघर्ष
पवनानगर : ऐतिहासिक लोहगड–विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली महागावमधील मालेवाडी. निसर्गसौंदर्य, पर्यटन आणि विकासाच्या गोंडस चित्रामागे दडलेल्या या गावाचे वास्तव मात्र वेदनादायी आहे. अवघ्या ४५० लोकसंख्या असलेल्या या वाडीतील नागरिक आजही वीज, पाणी, रस्ता आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित जीवन जगत आहेत.



“श्रीमंतांच्या दारात सगळे उभे राहतात, पण गरिबाची साधी विचारपूसही कोणी करत नाही,” ही भावना मालेवाडीतील प्रत्येक घरातून उमटते. येथील शाळकरी मुले रोज सकाळी शिक्षणासाठी पवनानगर गाठतात. तब्बल ८ किलोमीटरचा जंगलातील पायी प्रवास त्यांना करावा लागतो. वाटेत साप, अजगर, बिबट्या यांसारख्या जंगली प्राण्यांचा कायम धोका असतो. विशेष म्हणजे लहान मुलीही याच भयाण वाटेवरून शाळेत ये-जा करतात. अनेक वेळा ग्रामस्थांनी एसटी बसची सकाळ-संध्याकाळ एक फेरी सुरू करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच झाले आहे.


धनगर समाजातील जाईबाई मरगळे या आज्जींचे कुटुंब गेल्या तीन-चार पिढ्यांपासून मालेवाडीत वास्तव्यास आहे. मात्र आजही त्यांच्या घरात वीज पोहोचलेली नाही. वादळात घराच्या भिंती कोसळल्या, पत्रे उडून गेले, दरवाजे तुटले; पण गरिबीमुळे मदतीचा हात कुणी पुढे केला नाही. अंधारात जगणेच त्यांच्या नशिबी आले आहे.


एकीकडे धनाढ्यांना तात्काळ सुविधा मिळतात, तर दुसरीकडे मालेवाडीतील कुटुंबे शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या अंधारलेल्या वास्तवाची दखल महावितरण व प्रशासन कधी घेणार, हा प्रश्न कायम आहे. मालेवाडी ग्रामस्थांनी त्यांच्या मूलभूत सुविधांकडे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी ठाम मागणी केली आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















