पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था व भाजपा किसान मोर्चा यांच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी चाऱ्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील सामाजिक कार्य आणि शेतकरीहितासाठी नेहमीच तत्पर असलेल्या पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजपा किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव, भूम, परंडा परिसरातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या पशुधनासाठी सुक्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली.

गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी तळेगाव दाभाडे येथून तब्बल ८ ट्रक चारा पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आला. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. या मदतीमुळे पूरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, स्थानिक किसान मोर्चा पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
या उपक्रमाच्या प्रस्थानावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे, पतसंस्थेचे शरद शेलार, अजय भेगडे, दीपक भेगडे, राजेंद्र बुट्टे (पाटील), सुनील बबनराव भेगडे, अजय नथुराम भेगडे, भाजपा नेते रवींद्र अण्णासाहेब भेगडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले : “पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. किसान मोर्चा व पतसंस्थेच्या माध्यमातून आज चारा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, पुढील काळातही अशाच पद्धतीने मोफत चाऱ्याची व्यवस्था सातत्याने केली जाणार आहे. शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, हाच आमचा उद्देश आहे.”
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मावळ तालुक्यातील सामाजिक व राजकीय संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे मो. ९९२१८०७०११




















