सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६
पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी (दि. ३ मे) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अयान अझर शेख (वय २०), प्रथमेश भास्कर शिंदे (वय २१) आणि अश्विन अनिल भालेराव (वय १८, सर्व रा. पुणे) अशी मृत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्र. ३९/२०२६ बी.एन.एस.एस. १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील प्रतिक्षा अनिल भालेराव (वय २०) यांनी दिलेल्या खबरनुसार, त्या आपल्या मित्र-मैत्रिणींसह रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पवना नदीत पोहण्यासाठी मोटारसायकलवरून थुगाव येथे गेल्या होत्या. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सर्वजण नदीपात्रात उतरले.
यावेळी अयान शेख हा पाण्यात पुढे गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी प्रथमेश शिंदे व अश्विन भालेराव यांनी धाव घेतली; मात्र दुर्दैवाने तिघेही पाण्याच्या प्रवाहात बुडाले. घटनेनंतर उपस्थितांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने शोध घेऊन तिघांना बाहेर काढले.
त्यानंतर त्यांना तातडीने कामशेत येथील महावीर रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केले.
सदर घटना कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पुढील तपास पोलीस हवालदार सचिन काळे करीत आहेत. या प्रकरणाची नोंद पोलीस हवालदार उमाजी मुंढे यांनी केली आहे.
दरम्यान, पवना नदी परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी आणि पर्यटकांनी पाण्यात उतरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




















