
बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी च्या जाळ्या नादुरुस्त; त्वरित दुरुस्ती व नवीन जाळ्या बसविण्याची मागणी — माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रातील बनेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्या अत्यंत जीर्णावस्थेत असून, त्यांची त्वरित दुरुस्ती तसेच नवीन जाळ्या बसविण्याची मागणी माजी उपनगराध्यक्षा सौ. वैशाली प्रमोद दाभाडे यांनी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


सदर निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळाला तब्बल चार वर्षे पूर्ण होत असताना शहरात आवश्यक नागरी सुविधांचा अभाव जाणवतो आहे. नागरिकांच्या जीवनमानाशी निगडीत असलेल्या मूलभूत सोयीसुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची भावना शहरात वाढू लागली आहे. विशेषतः बनेश्वर स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्या पूर्णपणे निकामी झाल्या असून, त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तुटलेल्या व नादुरुस्त जाळ्यांमुळे अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहाचे पूर्ण दहन होत नाही, परिणामी इतर ठिकाणी जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला असून, नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


सध्या तळेगाव दाभाडे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या अंत्यविधींसाठी स्मशानभूमीची सध्याची जागा आणि सुविधा अपुऱ्या ठरत आहेत. अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या जाळ्यांची संख्या वाढविणे काळाची गरज असल्याचे सौ. वैशाली दाभाडे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
“स्मशानभूमी हे केवळ अंत्यसंस्काराचे ठिकाण नसून, ते शहराच्या संस्कृतीचा आणि संवेदनशीलतेचा आरसा आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता, सुविधा व सुरक्षिततेकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
स्मशानभूमीच्या जाळ्यांच्या दुरुस्तीबरोबरच परिसरातील स्वच्छता, दिवाबत्ती व्यवस्था, पाण्याची सोय आणि बसण्याच्या जागा यासारख्या मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.


नगरपरिषदेने या विषयाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक निधी मंजूर करून जाळ्यांची दुरुस्ती व नवीन जाळ्या बसविण्याचे काम त्वरेने सुरू करावे, अन्यथा नागरिकांचा रोष वाढेल, असा इशारा माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनीही या मागणीचे समर्थन करत, “प्रशासनाने या विषयाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर काम हाती घेतले पाहिजे,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















