
अंत्यविधीची दुरवस्था तळेगाव दाभाडेकरांची संतप्त हाक बनेश्वर स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत लोकसंख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली असताना गाव आणि स्टेशन विभाग अशा दोन भागांत असलेल्या स्मशानभूमींपैकी गाव विभागातील बनेश्वर स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बहुतांश अंत्यविधी याच ठिकाणी होत असल्याने जागा अपुरी पडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील आणि भावनिक क्षणी कुटुंबियांना ज्या किमान सोयी अपेक्षित असतात, त्या देखील येथे उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. देहाग्नी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी जाळ्या पूर्णतः नादुरुस्त झाल्या असून त्यांचा काही भाग कोसळलेला आहे. परिणामी अनेकदा अंत्यविधी जमिनीच्या पृष्ठभागावरच करावे लागत असल्याची हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुःखात बुडालेल्या नातेवाईकांना या अव्यवस्थेचा अतिरिक्त मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे नगरपरिषदेची तब्बल ४० कोटी रुपये खर्चून उभारलेली भव्य इमारत उभी आहे, तर दुसरीकडे मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा नसणे ही अत्यंत अशोभनीय बाब असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. कोट्यवधींचे बजेट असताना स्मशानभूमीसारख्या मूलभूत आणि अत्यावश्यक सेवेकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे.


यापूर्वी उपनगराध्यक्षा वैशालीताई प्रमोद दाभाडे यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देत तातडीने दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष अशोक काळोखे व माजी नगरसेविका सौ. निता काळोखे यांनी मुख्याधिकारी गिरिष दापकेकर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.


स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सोय, सुलभ शौचालय, अस्थिविसर्जनासाठी सक्षम व्यवस्था, संरक्षक भिंत, गॅस शवदाहिनीची तातडीने दुरुस्ती तसेच दशक्रिया विधीमंडपात आवश्यक सोयीसुविधा उभारण्याची मागणी जोर धरत आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी सावली, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छतेचा अभावही प्रकर्षाने जाणवत आहे.
जिवंतपणी सुविधा न मिळाल्या तरी चालतील, पण शेवटच्या प्रवासात तरी माणसाला सन्मान मिळावा अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी पालिका प्रशासन, संबंधित अधिकारी आणि राज्यकर्त्यांनी त्वरित दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

तळेगाव दाभाडेच्या वाढत्या लोकसंख्येला अनुरूप अशा मूलभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज असून, मृतांच्या सन्मानासाठी आणि जिवंतांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची आर्त हाक आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११























