ऐन गणपतीच्या धामधूमीत तळेगाव दाभाडेत भटक्या कुत्र्यांची दहशत
तळेगाव दाभाडे : शहरात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून ढोल-ताशांचा गजर, दिव्यांची रोषणाई आणि मंडपांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. मात्र या आनंदमयी पर्वाला गालबोट लावणारी समस्या म्हणजे भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत.
तळेगावातील अनेक वसाहती व मुख्य रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रात्री उशिरा घरी परतणारे कामगार, दुचाकीस्वार तसेच शाळा-कॉलेजमध्ये ये-जा करणारी मुले-मुली यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेक वेळा टोळक्याने कुत्रे अचानक समोर येऊन वाहनांचा पाठलाग करतात, पादचाऱ्यांना घाबरवतात. काही ठिकाणी गाड्यांच्या शीट फाडणे तसेच चावण्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्याने भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
विशेषतः कडोलकर कॉलनी, काळोखेवाडी, लक्ष्मीबाग कॉलनी आणि राव कॉलनी या भागांतील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत. स्थानिक रहिवाशांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी नोंदवूनही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या समस्येवर उपाययोजना म्हणून कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी मोहीम, तातडीने आश्रयस्थान उभारणे, तसेच कचरा व्यवस्थापन सुधारणा या गोष्टी तातडीने राबविणे आवश्यक आहे. मात्र या कामात नगरपालिकेची गती समाधानकारक नसल्याची खंत व्यक्त केली जाते.
गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि एकोपा साजरा करण्याचा पर्व आहे. त्यावेळी शहरभर भीतीचे सावट निर्माण झाले तर उत्सवाचा गाभाच मलिन होतो. त्यामुळे ही समस्या केवळ “प्रशासनाची जबाबदारी” न मानता नागरिक, स्वयंसेवी संस्था, प्राणीप्रेमी आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी एकत्र येऊन दीर्घकालीन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्यपूर्ण लसीकरण-नसबंदी मोहीम, नियोजित फीडिंग झोन आणि तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद यांचा योग्य समन्वय साधला तरच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी होईल. अन्यथा, शहरातल्या गणेशोत्सवाच्या उत्साहावर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची छाया पडत राहील.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)






















