तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण.जय शिवाजी, जय भवानी च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
तळेगाव दाभाडे : अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) ग्रुप सेंटरमध्ये शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्याने संपूर्ण लष्करी परिसर शिवमय झाला असून, शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा जागर अनुभवायला मिळाला.
ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे येथे आयोजित या कार्यक्रमात उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर (IPS) आणि आरसीडब्ल्यूए (RCWA) प्रमुख सौ. अनुजा निंबाळकर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अनावरणाच्या क्षणी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या निनादात महाराजांना अभिवादन केले. या प्रसंगी सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, कर्तव्यनिष्ठ जवान, त्यांचे कुटुंबीय तसेच परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली. अनावरणानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर यांनी शिवरायांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभारून लोकाभिमुख राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला. त्यांचे धैर्य, निर्णयक्षमता आणि न्यायनिष्ठा आजच्या प्रत्येक प्रशासकासाठी मार्गदर्शक ठरावी असे ते म्हणाले. स्वराज्य ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून ती स्वाभिमान, सुरक्षा आणि लोककल्याणाची भावना आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत चंद्रकांत निंबाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या सामाजिक परिस्थितीत असलेली उपयुक्तता अधोरेखित केली. तरुण पिढीने शिवरायांच्या जीवनातून नेतृत्व, शिस्त आणि देशभक्तीचे धडे घ्यावेत. त्यांची शिकवण ही राष्ट्रनिर्मितीची भक्कम पायाभरणी आहे असे ते म्हणाले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी शिवचरित्राचे अध्ययन आणि आचरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांनी विशेष रंगत आणली. केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात सादर केलेल्या लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. तालबद्ध हालचाली, एकसंध सादरीकरण आणि देशभक्तीने ओतप्रोत वातावरणामुळे कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण लाभले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात ऊर्जा संचारली.
महिला भजन मंडळाने पारंपरिक पाळना गीतांद्वारे शिवजन्माचा भावस्पर्शी आविष्कार सादर केला. त्यानंतर सादर झालेल्या जोशपूर्ण शिवगर्जना ने वातावरणात पराक्रमाची ज्वाला पेटवली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या सादरीकरणाला दाद दिली. भक्ती आणि शौर्य यांचा संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.
समारोपावेळी सर्व अधिकारी, जवान आणि उपस्थित नागरिकांनी सामूहिकरित्या महाराजांना अभिवादन केले. जय शिवाजी, जय भवानी च्या गगनभेदी घोषणांनी सीआरपीएफ परिसर दुमदुमून गेला. या घोषणांनी केवळ वातावरण भारावून गेले नाही, तर प्रत्येकाच्या मनात राष्ट्रसेवेची नवचेतना जागवली.
या पुतळ्याच्या स्थापनेमुळे सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये प्रेरणेचा नवा स्तंभ उभा राहिला आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांची प्रामाणिकता आणि लोकहितवादी दृष्टीकोन यांचा वारसा जपण्याचा दृढ निश्चय यावेळी सर्वांनी व्यक्त केला. शिवजयंतीनिमित्त पार पडलेला हा सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, कर्तव्य, शौर्य आणि स्वाभिमान यांची पुनःप्रत्ययकारक आठवण ठरला.
प्रतिनिधी:गणेश नामदेव भैगडे.९९२१८०७०११




















