
“फक्त प्रभागाचं नव्हे, तर तळेगाव-दाभाडे शहराचे भलं करणार नगरसेवक हवा
तळेगाव-दाभाडे : निवडणुकीच्या तोंडावर शहरात पुन्हा एकदा तोच मप्रश्न चर्चेत आला आहे — आपला नगरसेवक फक्त स्वतःच्या प्रभागापुरता मर्यादित राहणार, की संपूर्ण तळेगाव-दाभाड्याचं भलं पाहणार? कारण नागरिकांचा संयम आता संपत चाललाय.
व्यापाऱ्यांच्या समस्या कायम
शहरातील व्यापारी रोजच्या रोज वाहतुकीच्या कोंडी, चुकीच्या पार्किंगमुळे होणाऱ्या दंड आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या असमान वागणुकीचा त्रास सहन करत आहेत. व्यवसाय वाढवायचा तर नियोजनबद्ध बाजारपेठ आणि सुयोग्य नियमावलीची तातडीची गरज आहे.


ट्राफिकचा भडका
मुख्य चौक असो वा स्टेशन रोड — प्रत्येक ठिकाणी ट्राफिकचा गोंधळ! पावसाळ्यात तर या गर्दीला खड्ड्यांचं ‘टॉपिंग’ मिळतं. नागरिक त्रस्त, पोलिसही हैराण. तरीही ठोस उपाय कुठेच दिसत नाही.
सार्वजनिक सुलभ शौचालयांची कमतरता
‘स्वच्छ भारत’चा गाजावाजा मोठा, पण प्रत्यक्षात शहरात स्वच्छ आणि सुलभ शौचालयांचा अभाव आहे. महिलांसाठी, वृद्धांसाठी ही मोठी गैरसोय ठरत आहे.


पिण्याचं पाणी अजूनही स्वप्नवत
काही भागांत अजूनही पाणीपुरवठा विस्कळीत आहे. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहणं नागरिकांच्या नशिबात आलं आहे. शहर वाढतंय, पण पाणी नियोजन मागे राहिलंय.
पार्किंगचं गोंधळाचं
गाड्यांची संख्या झपाट्याने वाढतेय, पण पार्किंग व्यवस्था जागच्या जागीच! त्यामुळे रोजचा गोंधळ आणि भांडणं सुरूच.
शाळांतील टवाळखोरीचा कहर
शाळा आणि कॉलेज परिसरात वाढती टवाळखोरी, अश्लील भाषेचा वापर आणि भांडणं शिक्षणाच्या पवित्र वातावरणाला धक्का देत आहेत. यावर पालक आणि प्रशासन दोघांनीही गंभीरतेने लक्ष देणं गरजेचं आहे.
खड्डेमय आणि अंधारमय रस्ते
तळेगावच्या रस्त्यांवर चालताना आता ‘धाडस’ लागतं. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, तुटलेल्या गटारी आणि बंद पडलेले दिवे — यामुळे नागरिकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे.


सरकारी शाळा आजही दुर्लक्षित
शहरातील काही शाळा अजूनही जुन्या, पडझडीच्या अवस्थेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाच्या दर्जाचा प्रश्न गंभीर बनलाय.
क्रीडांगणं असुरक्षित
लहान मुलांसाठी असलेली क्रीडांगणं तुटक्या झोपाळ्यांमुळे आणि अनियोजित व्यवस्थेमुळे धोकादायक बनली आहेत. सुरक्षित आणि आधुनिक क्रीडांगणांची मागणी वाढतेय.
चोरीच्या घटना वाढल्या
गाड्या, मोबाईल आणि साखळी चोरीच्या घटना सतत वाढत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तरी अनेक ठिकाणी ते निष्क्रिय आहेत. नागरिकांना रात्री बाहेर पडताना असुरक्षित वाटतंय.
भटक्या कुत्र्यांचा त्रास
शहरात भटक्या कुत्र्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. यामुळे लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना दररोज भीतीतून जावं लागतं.
नागरिकांचा प्रश्न — “आमचा नगरसेवक नेमका कोणासाठी?”
निवडणूक आली की वचनांची बरसात होते, पण पाच वर्षांनी पुन्हा त्याच समस्या डोळ्यासमोर उभ्या राहतात.
तळेगाव-दाभाडेच्या सर्वांगीण विकासासाठी असा नगरसेवक हवा, जो फक्त मतांचा नाही तर जनतेच्या समस्यांचा हिशोब ठेवेल.
तळेगाव आता बदल मागतंय. आणि या बदलाचा निर्णय नागरिकांच्या हातात आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















