वडगाव शहरातील गुरुवारच्या बाजारात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियमबद्ध कारवाईची मागणी
वडगाव, ता. मावळ :
वडगाव शहरात दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात परिसरातील शेतकरी, फळविक्रेते व भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने येऊन शहरातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी आपापल्या गाड्या लावून दुकाने भरतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. परिणामी वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि अपघातांचा धोका वाढतो.
नागरिकांनी सूचित केले आहे की, विक्रेत्यांना मुख्य रस्त्याच्या फक्त एका बाजूने दुकान मांडण्यास सक्ती केल्यास शहरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही सोयीस्कर वातावरण मिळेल आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना (रुग्णवाहिका, अग्निशामक) अडथळा येणार नाही.
याबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासन व वडगाव पोलिस ठाण्याने संयुक्तरित्या नियमावली तयार करून तिची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बाजाराच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नेमणूक करणे, तसेच अनधिकृतपणे रस्त्यावर गाड्या उभ्या करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
वाहतुकीच्या अडचणीमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाही तोटा सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. बाजारात खरेदीसाठी आलेले ग्राहक गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे त्रस्त होऊन खरेदी टाळतात. त्यामुळे विक्रेत्यांचेही नुकसान होते.
स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने तातडीने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



















