शेतकऱ्यांना दिलासा : नुकसानग्रस्त भागातील कर्जवसुली थांबणार
कृषिमंत्री दत्ता भरणे यांची घोषणा
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी नुकसानग्रस्त भागातील कर्जवसुली तातडीने थांबवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी बुधवारी (दि. २४) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
राज्यभर पंचनामे युद्धपातळीवर
भरणे म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यात तब्बल २ लाख ५४ हजार एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी संकटात सापडले आहेत. या सर्वत्र पंचनाम्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. महसूल व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांना आता नुकसान सिद्ध करण्यासाठी वेगळे फोटो द्यावे लागणार नाहीत.”
२२१५ कोटींचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
राज्य सरकारने नुकसानीची भरपाई करण्यासाठी मदतीची प्रक्रिया गतीमान केली असून, मंगळवारी (दि. २३) शासनाकडून २२१५ कोटी रुपये निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. अजूनही आकडेवारी वाढत असून त्यानुसार मदत दिली जाणार आहे. “दिवाळीपूर्वी कोणतीही मदत थांबणार नाही, प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळेल,” असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष आढावा घेत
राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांची भेट घेऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असेही भरणे यांनी नमूद केले.
संकट काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
नुकसानग्रस्त भागात कर्जवसुली थांबवण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. पंचनाम्यानंतरची मदत थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मदत मिळेल. “या संकट काळात शेतकरी एकटे नाहीत. शासन ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे,” असेही कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट केले.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे मो. ९९२१८०७०११



















