मराठा आरक्षण आंदोलनासाठी मावळ तालुक्यातील दानशूरांचा पुढाकार
मुंबई आझाद मैदानावर आंदोलकांसाठी दररोज खाद्यसामग्री पाठवली जात
मुंबई/मावळ – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला मावळ तालुक्यातील दानशूर मंडळींनी मोठा हातभार लावला आहे. मराठा बांधवांना आंदोलनाच्या काळात अन्न-पाण्याची कमतरता भासू नये यासाठी मावळातून दररोज मोठ्या प्रमाणात खाद्यसामग्री मुंबईत पोहोचवली जात आहे.
दानशूर व्यक्तींनी चटणी-भाकरी, बिस्कीट, तांदूळ, डाळ, पिण्याचे पाणी, फळे, तसेच इतर जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात पाठवण्याची जबाबदारी घेतली आहे. काही मंडळी स्वतः मुंबईपर्यंत जाऊन हे साहित्य आंदोलकांच्या हातात देत आहेत, तर काही मंडळी तालुक्यातून ट्रक, पिकअप व खासगी वाहनांद्वारे रसद पोहोचवण्याचे काम करत आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या मनोबलासाठी या मदतीचे मोठे योगदान होत असून, “मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील” अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे. मावळातील शेतकरी, व्यापारी, उद्योगपती, तसेच महिलाही या सामाजिक बांधिलकीच्या कार्यात सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत.
“आंदोलनकर्ते उपाशी राहू नयेत, त्यांना रोजच्या गरजेच्या वस्तू वेळेवर मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा लढा समाजाचा आहे आणि समाजाच्या शक्तीनेच तो यशस्वी होणार आहे,” असे स्थानिक दानशूर व्यक्तींनी सांगितले.
दरम्यान, आयोजकांनी आवाहन केले आहे की, “जोपर्यंत आंदोलन सुरू राहील, तोपर्यंत मावळ तालुक्यातील पंचक्रोशीत दानशूर व्यक्तींनी अशीच मदत सुरू ठेवावी.”
ग्रामीण भागातून मिळणाऱ्या या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या आंदोलकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मराठा समाजाच्या एकजुटीचे हे दर्शन असल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त केली जात आहे.
(प्रतिनिधी : संजय दंडेल)




















