
मावळ तालुक्यात भक्तीचा जागर काकड आरतीच्या मधुर स्वरांनी पहाट दररोज पांडुरंगमय
मावळ:कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यांनी न्हालेल्या रात्रींनंतर आता मावळ तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात भक्तीची पहाट उजाडते आहे. अश्विन कृष्ण प्रतिपदेपासून सुरू झालेला काकड आरती उत्सव सध्या तालुक्याच्या प्रत्येक गावात, प्रत्येक विठ्ठल मंदिरात भक्तिभावाने साजरा होत आहे. पहाटेच्या शांत वातावरणात “उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा…” या आर्त स्वरांनी पांडुरंगाला जागे करण्याचा भक्तिभावाचा सोहळा रोज साक्षीदार ठरत आहे.


वारकरी संप्रदायातील ही परंपरा फार प्राचीन असून, कोजागिरी पौर्णिमेनंतर सुरू होणारी ही आरती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अखंडपणे चालते. एक महिनाभर दररोज पहाटेच्या वेळी पांडुरंगाला जागविण्यासाठी गावोगावच्या भाविक मंडळी मंदिरात एकत्र येतात. भजन, अभंग, वासुदेव, भूपाळ्या यांच्या सुमधुर स्वरांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघते.
वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आषाढ शुद्ध एकादशीपासून (देवशयनी) ते अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंतचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या काळात पांडुरंग निद्रिस्त असतो, त्यामुळे अश्विन कृष्ण प्रतिपदेपासून म्हणजेच कोजागिरीनंतर काकड आरतीच्या माध्यमातून भक्त त्याला जागे करतात.


मावळ तालुका हा संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पाऊलखुणांनी पावन झालेला प्रदेश. त्यामुळे या तालुक्यात वारकरी संस्कृतीचा प्रभाव सर्वत्र जाणवतो. आश्विन महिन्यात रोज पहाटे मंदिरांमधून उमटणारे अभंग, टाळ-मृदंगाचे नाद आणि भाविकांचा गजर या भक्तीमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.
मावळ तालुक्यातील बहुतांश गावांतील विठ्ठल मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमेनंतरच काकड आरतीचा उत्सव सुरू होतो. गावातील सार्वजनिक मंडळे, भजनी मंडळे, काकड आरती समित्या, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे सुंदर नियोजन केले जाते. पहाटे चार वाजताच मंदिरात टाळकरी, मृदंगवादक, विणेकरी जमा होतात आणि आरतीच्या मंगल वातावरणात दिवसाचा शुभारंभ होतो.


मंदिरांची स्वच्छता, फुलांच्या माळा, रांगोळ्या, आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेले देवालय — हे सर्व दृश्य पहाटेच्या मंद प्रकाशात अधिकच देखणे भासते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या आरतीत सहभागी होतात. “काकडा आरती म्हणजे देवाला जागविण्याबरोबरच स्वतःच्या अंतःकरणातील भक्ती जागविण्याची प्रक्रिया आहे”, असे भाविक सांगतात.
दररोज सकाळी मंगलाचरण करून आरंभ केला जातो. त्यानंतर काकड आरतीचे अभंग, भूपाळ्या, वासुदेव, जोगी, गौळणी, विनवणीचे अभंग अशा भक्तीगीतांचा अखंड निनाद होतो. शेवटी उपसंहार आरती व प्रार्थना केली जाते. यानंतर सर्व भाविक तीर्थप्रसाद ग्रहण करून समाधानी मनाने घरी परततात.
या सोहळ्यात विशेषतः माता-भगिनींचा उत्साही सहभाग पाहायला मिळतो. पांडुरंगाच्या प्रतिमेला पंचामृत स्नान घालून नवे वस्त्र, हार-तुरे अर्पण केले जातात. भक्तिभावाने सजलेले हे देवालय म्हणजे गावागावात भक्तीची पहाट उजळवणारे केंद्र बनते.
कार्तिक महिन्याच्या प्रारंभासोबत सुरू झालेली ही परंपरा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अखंड सुरू राहते. मावळ तालुक्यातील दर गावात, दर मंदिरात पहाटेच्या शांत वेळेत उमटणारा हा भक्तिरसपूर्ण निनाद म्हणजे वारकरी संस्कृतीचा जीवंत श्वास आहे.
आजही मावळ तालुक्यातील असंख्य भाविक या प्राचीन परंपरेचा मान राखत, दररोज पहाटेच्या अंधुक प्रकाशात विठ्ठलाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करत आहेत. आणि अशा भक्तीमय सूरांनी संपूर्ण मावळ तालुका “पांडुरंगमय” झाल्याचे दृश्य अनुभवास येत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















