संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा डोंगरावर वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
इंदोरी : टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी यांच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सोहळा संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. मोरे यांनी संत साहित्य व परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले,
“संत तुकाराम महाराजांनी या पवित्र भंडारा डोंगरावर असंख्य अभंगांची रचना केली. येथे केवळ वृक्ष-पक्षीच नाही, तर अगदी पाषाणसुद्धा तुकोबांचे सोयरे झाले होते. संत हे वरकरणी माणसासारखे दिसतात, पण त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा अखंड झरा वाहत असतो. त्यांच्याकडे द्वेष, मत्सर, भेदभाव यांना कधीच स्थान नसते.”
तसेच ते पुढे म्हणाले,
“लहान वयाच्या संत मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना आत्मजाणिव करून देत ताटी उघडण्यास भाग पाडले, हीच संतपरंपरेची थोरवी आहे. संतांचे साहित्य केवळ वाचायचे नाही, तर ते जीवनाला दिशा देणारे आणि मूल्यांची जाणीव करून देणारे आहे. विद्यार्थी तुकोबांचे अभंग वाचतील आणि कदाचित त्यातून नवीन काव्य तुमच्या अंतःकरणात जन्म घेईल. यासाठी सृजनशीलतेचा मार्ग आत्मसात करणे गरजेचे आहे.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम, जीवनमूल्यांची जाणीव व सृजनशीलतेची प्रेरणा जागृत झाली. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून ही नवी पायरी ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक रमेश अवस्थे, काशिनाथ देवधर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, मराठी विभागप्रमुख प्रा. महादेव रोकडे, हिंदी विभागप्रमुख डॉ. अविनाश कोल्हे, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भंडारा डोंगराच्या पवित्र वातावरणात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याने वाङ्मय मंडळाच्या कार्याला एक नवा उत्साह लाभला असून विद्यार्थ्यांना संत साहित्याचा अभ्यास आणि सृजनशीलतेचा वारसा घेण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
(प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११)






















