
मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचे निलंबन रद्द पुन्हा मावळ तालुक्याच्या तहसीलदारपदी पदस्थापना
मावळ (पुणे): मावळ तालुक्याचे तहसीलदार श्री. विक्रम देशमुख यांचे निलंबन अखेर रद्द करण्यात आले असून, त्यांना पुन्हा मावळ तालुक्याच्या तहसीलदारपदी पूर्ववत कार्यरत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.


मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील गट क्रमांक ३५ ते ४५ दरम्यान सुरू असलेल्या कथित अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार विक्रम देशमुख यांचे २३ डिसेंबर २०२५ रोजी निलंबन करण्यात आले होते. संबंधित प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम १९७९ चे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला होता.
निलंबन आदेशानंतर श्री. देशमुख यांनी शासनाकडे आपला खुलासा सादर केला होता. या खुलाशाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे यांनी सविस्तर अहवाल व अभिप्राय शासनाकडे पाठविला. सदर अभिप्रायाचा विचार करून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शासनाने निलंबन आदेशाचा फेरविचार केला.


विभागीय आयुक्तांच्या अहवालात श्री. देशमुख यांच्या विरोधात विभागीय चौकशी आवश्यक ठरणार नाही, असा अभिप्राय नोंदविण्यात आल्याने शासनाने निलंबन आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २३ डिसेंबर २०२५ रोजीचा निलंबन आदेश रद्द करण्यात आला असून, श्री. विक्रम देशमुख यांना “तहसीलदार, मावळ, जि. पुणे” या पदावर पूर्ववत नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश जारी करण्यात आला असून, शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी सदर आदेशावर स्वाक्षरी केली आहे.


तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या निलंबन रद्दीच्या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाला पुन्हा गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या निर्णयाचे मावळ तालुक्यातील नागरिक, सामाजिक व प्रशासकीय वर्तुळात स्वागत करण्यात येत आहे.





















