वडगांव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे ‘व्हिजन २०३०’ जनसंपर्क अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी वडगाव मावळात अभियानाचा शुभारंभ
वडगाव मावळ, दि.१५ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहर भाजपातर्फे ‘व्हिजन २०३०’ जनसंपर्क अभियान सुरू करण्यात येणार आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाद्वारे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरीकांच्या सूचना स्विकारून त्या थेट भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे.
नगरपंचायतीचा राजकीय प्रवास
वडगाव नगरपंचायतीची पहिली निवडणूक २०१८ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर एकूण ७ उमेदवार विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत पक्षाने नगराध्यक्ष पद मिळविण्याबरोबरच नगरपंचायतीतील संख्याबळ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दिशेने शहर भाजपाकडून संघटनात्मक बळकटीसह नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
घराघरात पोहोचणार भाजप कार्यकर्ते
‘व्हिजन २०३०’ अभियानाअंतर्गत शहर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरात भेट देऊन नागरिकांना विशेष प्रश्नावली वितरित करणार आहेत. या प्रश्नावलीत परिसरातील नागरी सुविधा, नगरपंचायत कार्यालयाच्या सेवा, कर आकारणी, प्रस्तावित विकास आराखडा (डी.पी.) अशा विविध विषयांवर वस्तुनिष्ठ व पर्यायी प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या मौल्यवान सूचना मांडता याव्यात यासाठी स्वतंत्र जागाही ठेवण्यात आली आहे.
नागरिकांच्या सूचनांवर आधारित जाहीरनामा
या अभियानातून गोळा झालेल्या सूचना, मते आणि अपेक्षा संकलित करून त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. यामधील महत्त्वपूर्ण व रचनात्मक सूचना भाजपाच्या आगामी जाहीरनाम्यात स्थान मिळवतील. नागरिकांच्या थेट सहभागातून तयार होणारा हा जाहीरनामा खर्या अर्थाने लोकाभिमुख असेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
शहराध्यक्षांची माहिती
शहर भाजपाचे अध्यक्ष संभाजी म्हाळसकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजेच १७ सप्टेंबरपासून या जनसंपर्क अभियानाची सुरुवात होईल. प्रत्येक नागरिकाच्या मनातील अपेक्षा जाणून घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधणे हेच ‘व्हिजन २०३०’ चे प्रमुख ध्येय आहे.”






















