आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ जयंत नारळीकर यांचे निधन
विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ जयंत नारळीकर यांचे आज मंगळवार दिनांक २०मे २०२५ रोजी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. जयंत नारळीकर यांना वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता यावरून त्यांची प्रखर बुद्धिमत्ता स्पष्ट होते.
११ जुन १९६४ रोजी त्यांनी गुरुत्वा कर्षणा संबंधीचा सिद्धांत मांडला होता त्यातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्य वरील संशोधनाला जगात चालना मिळाली. जयंत नारळीकर हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व मराठी विज्ञान कथेला आधुनिक चेहरा देणारे लेखक होते.९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
डॉक्टर नारळीकर हे विज्ञाननिष्ठ भूमिकेसाठी ओळखले जात त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथा आणि विज्ञान विषयक लेख समाजात लोकप्रिय ठरले आहेत.
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले आहे. तसेच स्मिथ प्राईज, ॲडम्स प्राईज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने देखील डॉ जयंत नारळीकरांचा गौरव झाला आहे. अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफारीला, टाईम मशीनची किमया, प्रेषित, यक्षाची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते. गणितातील गमती जमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, इत्यादी अनेक पुस्तके लिहून त्यांनी साहित्य विश्वाची देखील सेवा केली आहे. त्यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.




















