उच्च विद्या विभूषित असूनही सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उर्मिलाताई छाजेड
संजय दंडेल
“आजी-आजोबांना व्हावी काठी, युवांना मिळावा दिशा,
महिलांना लाभावे माहेर, आणि वंचितांना सापडावे नवे जीवन…” ही फक्त एक ओळ नाही, तर तळेगाव दाभाडेच्या उर्मिला भरतकुमार छाजेड यांचे जीवनमंत्र आहे.
पुण्यनगरीसारख्या संस्कृती आणि विद्येच्या माहेरघरात जन्मलेल्या उर्मिलाताईंची जडणघडण एका संपन्न व समाजाभिमुख कुटुंबात झाली. शिक्षणाने त्या MA, B.Ed. अशा उच्च पदवीपर्यंत पोहोचल्या, पण “शिक्षणाचा खरा अर्थ म्हणजे समाजासाठी उपयोगी पडणे” हा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच शहरातील झगमगाटात वाढलेल्या या ताई, मावळमधील कामशेत येथे भरतकुमार छाजेड या युवा उद्योजकाशी विवाहबद्ध झाल्या आणि संसाराच्या कक्षा रुंदावत त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलेसे केले.
समाजासाठी ‘संगोपन’
घरगुती जीवन नेटके सांभाळत उर्मिलाताईंनी स्वतःचा गलेगट्ट पगार सोडून पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेतले. महिलांना त्यांचे हक्काचे माहेर मिळावे, हीच त्यांची मोठी स्वप्ने. आणि त्यातूनच जन्माला आली संगोपन ही संस्था.
इथे माहेरची उणीव भासणाऱ्या महिलांना माहेरची उब मिळते. लग्न झालेल्या कोणत्याही वयाच्या स्त्रिया येथे चार दिवस राहू शकतात. त्यांची पाठवणी अगदी माहेरसारखी – साडी-चोळी, ओटी, फळांचा वानवळा देऊन केली जाते. आजवर ५०० हून अधिक संसार त्यांच्या समुपदेशनामुळे तुटण्यापासून वाचले आहेत.
ज्येष्ठांसाठी ‘वानप्रस्थाश्रम’
तळेगाव दाभाडे येथील वानप्रस्थाश्रम आनंदघर – इथे ५० ज्येष्ठ नागरिकांचे जगणे उर्मिलाताईंच्या मायेच्या छायेखाली आनंदी झाले आहे.
घरच्यांनी नाकारलेल्या आजी-आजोबांची औषधोपचाराची जबाबदारी ताईंनी स्वतः उचललेली आहे. मृत्यूपश्चात जर नातलग नसेल, तर त्यांच्या अंतिम संस्काराची जबाबदारीही उर्मिला ताईच पार पाडतात. हे फक्त कार्य नाही, तर मानवतेचे थोर उदाहरण आहे.
वंचित मुलांसाठी ‘कलाश्रम’
आदिवासी आणि वंचित मुला-मुलींचे आयुष्य घडविण्यासाठी कलाश्रम ही संस्था त्यांच्यासोबत जोडलेली आहे. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वास देणे हा त्यांचा ध्यास आहे.
समाजकारणातील बहुआयामी प्रवास
१२ वर्षे माध्यमिक शिक्षिका व ६ वर्षे मुख्याध्यापिका म्हणून शिक्षणक्षेत्रात मोलाची सेवा.
JCB, UPS Foundation सारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून स्त्रिया, मुले व ज्येष्ठांसाठी उपक्रम.
२०० ते २५० व्याख्याने शाळा-कॉलेजमध्ये देऊन युवकांचे प्रबोधन.
हॉस्पिटल स्टाफसाठी टाइम मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि विविध सामाजिक संस्थांशी जिव्हाळ्याचे संबंध.
इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणून कार्यरत.
गौरवशाली पुरस्कार
उर्मिला ताईंच्या कार्याचा गौरव आजवर ५७ हून अधिक संस्थांनी केला आहे. त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार –
आदर्श महिला पुरस्कार – तळेगाव दाभाडे नगरपरिषद
जायंट्स नारीशक्ती पुरस्कार
माता त्रिशला पुरस्कार – ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली
समाज भूषण पुरस्कार – नवचैतन्य संस्था पुणे
मावळ भूषण पुरस्कार – पुढारी वृत्तपत्र समूह
नारी रत्न गौरव पुरस्कार – लेक माहेरची कट्टा पुणे
समाजातील ‘ताई’ – “होय, मी दुर्गा!”
प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दाखवलेले कार्य हे एक दीपस्तंभ आहे. ज्येष्ठांना आधार, महिलांना माहेर, वंचित मुलांना शिक्षण, आणि युवकांना दिशा – या चारही पिढ्या आज त्यांच्या कर्तृत्वाने स्पर्शून गेल्या आहेत.



















