
उर्सेतील राक्षसी कृत्याने मावळ खवळला; आरोपीला फाशी द्या २९ डिसेंबरला ‘मावळ बंद’चा इशारा
मावळ : माणुसकी जिवंत आहे का, असा संतप्त सवाल उर्से गावातील अमानुष घटनेनंतर संपूर्ण मावळ तालुक्यातून घुमत आहे. पाच वर्षांच्या निष्पाप परप्रांतीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा राक्षसी प्रकार उघडकीस येताच समाजमन हादरले असून, या क्रूर कृत्याने पुणे जिल्ह्याच्या काळजावर घाव घातला आहे. मालेगावच्या घटनेची धग कमी होण्याआधीच उर्सेतील या नराधम घटनेने जनतेचा संयम सुटला असून, न्यायासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका घेत सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी ‘मावळ बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.


निष्पापांच्या रक्तावर राजकारण नको, न्याय हवा असा आक्रोश करत उर्से ग्रामस्थ, अखंड मराठा समाज, सर्वपक्षीय संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे( पाटील) यांच्या नेतृत्वाखाली मावळातील सर्व जाती-धर्मांचे नागरिक या आंदोलनात सहभागी होत असून, हा लढा केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे ठणकावून सांगण्यात येत आहे. आरोपीला तातडीने अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा व कठोरात कठोर शिक्षा फाशीच देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी केली जात आहे.


न्यायाच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी १० वाजता मावळातील प्रमुख ठिकाणी संतप्त निषेधाचा उद्रेक होणार आहे. तळेगाव-चाकण चौक, ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि तळेगाव–वडगाव फाटा येथे हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध करणार आहेत. माता-भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, युवकांचा सहभाग लक्षणीय राहणार आहे.


दरम्यान, या घटनेनंतर मावळातील सामाजिक वातावरण पेटले आहे. कोणताही उद्रेक होऊ नये म्हणून पोलिसांनी उर्से व तळेगाव परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असला, तरी जनतेचा रोष आवरण्यापलीकडे गेल्याचे चित्र आहे. ‘मावळ बंद’दरम्यान शाळा, बाजारपेठा, उद्योग आणि वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे. माणुसकीच्या हत्येविरोधात आता मावळ निर्णायक लढ्याच्या भूमिकेत उभा ठाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















