कामशेत मधील वाहतुक कोंडी ने नागरिक हैराण
कामशेत : येथे तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने नाणे मावळ पवन मावळ व आजूबाजूच्या गावातील नागरिक येथे खरेदीसाठी येत असतात येथे येणारे नागरिक आपली वाहने देखील घेऊन येतात त्या गाड्यांना पार्किंगची सोय नसल्याने गाड्या रस्त्यातच कुठेही लावल्या जातात. त्यामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होत असते. कामशेत मधील वाहतूक कोंडीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून हि वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे.
नागरिकांना येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावरून पायी चालणे देखील अवघड झाले आहे. हि वाहतूक कोंडी कधी सुटणार? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणपती चौक, बाजारपेठ, मच्छी मार्केट, साईबाबा चौक, जैन इंग्लिश स्कूल, नाणे व पवना नगर रोड या भागात रोजच वाहतूक कोंडी होते.
कामशेत पवनानगर चौकात दररोज सकाळ संध्याकाळ तासंन तास वाहतूक कोंडी होते. कामशेत हे मावळ तालुक्यातील मध्यवर्ती शहर असल्याने येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज होणारी वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी अतिक्रमणे काढली होती. बाजारपेठेत सिमेंट काँक्रेट रस्ता देखील झाला आहे मात्र काही व्यवसायिकांनी आपल्या दुकानाचे ओटे रस्त्यापर्यंत आणले असून विक्रीचे साहित्य रस्त्यालगतच ठेवले आहे.
त्यातच अतिक्रमणे वाढली असून त्यामुळे बाजारपेठ परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. वाहन चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या लावतात. कामशेत हे झपाट्याने प्रगती करत आहे. पुढील होणाऱ्या विकासाच्या दृष्टीने येथे वाहनतळ असणे गरजेचे आहे असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कामशेत मध्ये गाड्या पार्किंगची सोय नाही. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली व उंची वाढली त्यामुळे गाड्या दुकानासमोर लावल्या जातात.
प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही पोलीस यंत्रणा कमी पडते. तसेच ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असून स्थानिक राजकीय पक्षाची उदासीनता देखील येथे पाहायला मिळते. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाय योजना शहरात राबविल्या जात नाही.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















