
छठपुजेचा जल्लोष, मराठा आंदोलनाची तहान — मुंबईत दोन भारत उभे
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी. देशाच्या आर्थिक हृदयाची धडधड. पण आज हीच मुंबई दोन तुकड्यांत विभागली आहे एका बाजूला उत्सव, दुसऱ्या बाजूला अन्याय. एका बाजूला छठपुजेचा उत्सवमय गजर, ६७ ठिकाणी पूजेची स्थळं, १४८ विसर्जन तलाव, ४०३ चेंजिंग रूम्स आणि महापालिकेचा झगमगाट असा की जणू महाराष्ट्र नव्हे, तर बिहारची राजधानीच इथे उभी आहे! प्रशासनाची तत्परता पाहिली की कुणालाही वाटेल, मुंबई महापालिका म्हणजे “मुंबई छठ समिती”च.


मराठा आंदोलन. आरक्षणासाठी, सन्मानासाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरलेले मराठा बांधव. पण त्यांच्या आंदोलनासाठी नाही पिण्याचं पाणी, नाही जेवण, नाही स्वच्छतागृह!
एका बाजूला परप्रांतीयांच्या उत्सवासाठी सरकारी यंत्रणा झोकून देणं, आणि दुसऱ्या बाजूला मातीतल्या लेकरांकडे अमानुष दुर्लक्ष ही दुहेरी भूमिका आता असह्य झाली आहे.


हे केवळ प्रशासनाचं अपयश नाही; हा मराठी माणसाचा अपमान आहे.
छठपूजेच्या ठिकाणी विजेच्या लाईट्स, पाण्याचे टँकर, पोलीस बंदोबस्त आणि स्वच्छतागृहे सज्ज. पण मराठा आंदोलनकर्त्यांसाठी केवळ आश्वासनं आणि राजकीय दांभिकतेचा मुखवटा. ज्यांच्याकडे मतांचं गणित आहे, त्यांच्यासाठी व्यवस्था झुकते;
ज्यांनी या भूमीला घामाने पाणी पाजलं, त्यांच्यासाठी कोरडं आश्वासन उरतं. मुंबईत मराठी माणूस आज कोपऱ्यात ढकलला गेला आहे. रेल्वे स्टेशनात, बाजारपेठांत, नोकरीच्या रांगेत सर्वत्र परप्रांतीयांची गर्दी, आणि स्थानिक माणूस ‘आपल्या घरात परका’ बनला आहे.
“आपल्या राज्यात आपणच परके” ही वेदना आता मराठी मनाच्या खोलवर पोचली आहे. छठपूजेचं आयोजन ही सांस्कृतिक एकता नव्हे; हा मतपेट्यांचा उत्सव आहे. ज्यांना मतांचं वजन आहे, त्यांच्यासाठी व्यवस्था झुकते.
पण मराठी माणूस विसरणार नाही कोण त्याच्यासाठी तहानलेला राहिला, आणि कोणासाठी तलाव, लाईट्स, टँट आणि सुविधा उभ्या केल्या!


आज मराठा आंदोलन फक्त आरक्षणाचं नाही,
तर अस्मितेच्या अस्तित्वाचं युद्ध बनलं आहे.
आणि जर प्रशासनाने आजही हा राग ओळखला नाही,
तर उद्या तो फक्त आंदोलनात नव्हे, तर मतदानपेटीत उसळेल.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















