
छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोजच वाहतुक कोंडी राज’! 24 वॉर्डन गायब… नागरिक-रिक्षाचालकांची मोफत ट्रॅफिक ड्युटी.
तळेगाव दाभाडे:तळेगाव स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक—नाव मोठं, पण कामाच्या बाबतीत अगदी रामभरोसे! या चौकात दिवसभर आणि रात्रभर सुरू असलेल्या वाहतुकीची कोंडीचे साम्राज्य आता इतके विकोपाला गेले आहे की स्थानिक नागरिक, रिक्षाचालक, प्रवासी—सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे.


वाहतूक नियंत्रणासाठी नगरपरिषद आणि पोलीस विभागाकडून एकूण २४ वॉर्डन व कर्मचारी नियुक्त आहेत. पण प्रत्यक्षात काय? तर या ‘२४ पैकी २४’ जणाचा मोठा लवाजमा फक्त स्टेशन चौकातील गप्पांचा कट्टा रंगवण्यातच रमलेला दिसतो. ड्युटीवर कोण, कुठे, कधी, कसे—या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नसून ही मंडळीच फक्त देऊ शकतात. परिणाम असा की या संवेदनशील ठिकाणी एकही वॉर्डन दिसत नाही.
दुपारी कंपन्यांच्या बस, आयवा गाड्यांची गर्दी… सायंकाळी भाजी-बाजार, खाद्यपदार्थ विक्रेते, त्यातही वाईन शॉपवर येणाऱ्या ग्राहकांची उभी-आडवी, तिरकी-सरळ पार्किंग—रस्ता म्हणजे रस्ताच राहिलेला नाही, तर गाड्या ठेवण्याची मोफत गॅलरीच तयार झाली आहे.


अधिकृत पार्किंग व्यापून टाकले ते व्यापाऱ्यांनी, आणि त्या व्यापारी पार्किंगवर कब्जा केला अनधिकृत फेरीवाल्यांनी. पालिकेला भुईभाडे फक्त ४० रुपये, पण व्यवसायिक मात्र हजारो रुपयांची उकळी काढत मालामाल!
रस्ते मात्र नागरिकांच्या डोक्याला ठेच देत कायम टाळेबंदीच्या अवस्थेत.
या चौकात असलेले रिक्षाचालक तसेच काही जागरूक नागरिक गेली दहा-पंधरा वर्षे ही कोंडी स्वतःहून काढताना दिसतात. निवडणुका झाल्या, लोकप्रतिनिधी आले-गेले, नवीन आश्वासने, नवी स्वप्ने, नवी घोषणापत्रे… पण या वाहतुक कोंडीचे नशीब मात्र बदललेच नाही.


पालिका प्रशासनाचा वरदहस्त आणि ‘चालेल’ संस्कृतीमुळे अतिक्रमणे अक्षरशः माजली आहेत. फुटपाथ, रस्ते, वळणे—सगळीकडे ‘मी प्रथम’ असा व्यवसायिकांचा हेका. नियमांचे धिंडवडे काढत हे अतिक्रमण वाढतच आहे, आणि त्याची किंमत भरावी लागते सर्वसामान्यांना.
दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वत्र गोंगाट, हॉर्नांचा महापूर, गाड्यांची तुफान गर्दी आणि गच्च भरलेला चौक—या सर्वांमुळे प्रवास करणे म्हणजे जणू युद्धात जाणे!
अधिकाऱ्यांचे डोळे बंद, वॉर्डनांचा पत्ता नाही आणि वाहतूक मात्र नागरिकांच्या गळ्यात टांगलेला ‘मोफत ड्युटीचा क्रॉस’!
सर्वात मोठी विडंबना म्हणजे—
वाहतूक कोंडी काढायला पगारदार वॉर्डन नाहीत,
पण बिनपगारी रिक्षाचालक मात्र कायम हजर!
या सर्व परिस्थितीवर नागरिकांचा एकच सवाल—
“अखेर हा चौक कुणाच्या भरोशावर चालतो? प्रशासनाच्या की फक्त आमच्या?”
प्रशासन झोपेत, वॉर्डन बेपत्ता आणि कोंडी कायम.
तळेगाव स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतुक‘कोंडी राज’ कायम असल्याचे वास्तव आता कुणीही झाकून ठेवू शकत नाही.
प्रतिनिधी= गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















