टाकवे बु., फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा
नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन
टाकवे (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुनील आण्णा शेळके यांनी राबविलेल्या “जनसंवाद अभियान” या उपक्रमाचा पुढचा टप्पा टाकवे बु. ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील टाकवे बु., फळणे, बेलज, राजपुरी व भोयरे पाथरगाव या गावांमध्ये पार पडला.
या दौऱ्यात स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या दैनंदिन जीवनातील विविध अडचणी आमदारांसमोर मांडल्या. पाणीपुरवठ्याची टंचाई, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वारंवार खंडित होणारी वीज, रेशनकार्ड मिळण्यातील अडचणी, एस.टी. बससेवेची अनियमितता, पाणंद रस्ते खुले करण्याची मागणी या मुद्द्यांवर ग्रामस्थांनी भर दिला. याशिवाय, कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे यासंबंधीही ठोस निर्णय घेण्याची मागणी नागरिकांनी केली.
कार्यक्रमात महसूल, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, विद्युत वितरण कंपनी, वनविभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांसमोर नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आमदारांनी दिले.
यावेळी आपले विचार मांडताना आमदार सुनील शेळके म्हणाले –
“जनसंवाद हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून तो लोकांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्यांच्या अडचणींवर त्वरित उपाय शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तळेगाव व वडगाव येथील जनसंपर्क कार्यालयात अनेक नागरिक भेट देतात, परंतु काही जणांना तिथे पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे मी स्वतः त्यांच्या गावी जाऊन त्यांचे प्रश्न ऐकतो आहे. आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन थेट जनतेशी संवाद साधून विकासासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील.”
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. समस्यांचे निवारण करण्यासाठी आमदार प्रत्यक्ष हजर राहतात, अधिकारी वर्गालाही सोबत घेऊन त्वरित निर्णय घेतात, त्यामुळे “जनसंवाद” अभियान हा केवळ राजकीय उपक्रम नसून, मावळ तालुक्यातील विकासाला गती देणारा आणि लोकशाही अधिक सक्षम करणारा टप्पा ठरत आहे.




















