डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना निषेधार्थ वडगाव येथे भव्य एल्गार मोर्चा
वडगाव मावळ : लोणावळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना १४ ऑगस्ट २०२५ रोजी एका समाजकंटकाने केली होती. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक, राजकीय व आंबेडकरी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर तसेच मावळ तालुक्यातील विकासकामांची झालेली दुरवस्था, नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आदी मुद्द्यांवर आवाज बुलंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका यांच्यावतीने गुरुवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वडगाव मावळ येथे भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चाची सुरुवात श्री पोटोबा महाराज मंदिरापासून होऊन तहसीलदार कार्यालयापर्यंत जाणार असून मोर्चाद्वारे शासन प्रशासनाला ठोस निवेदन देण्यात येणार आहे.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित माथाडी कामगार युनियन यांसह पक्षाच्या विविध समित्या, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच आंबेडकर चळवळीशी संबंधित सर्व संघटना, संस्था व नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका अध्यक्ष नितीन मारुती ओव्हाळ यांनी केले आहे.
या एल्गार मोर्चामुळे वडगाव शहर व परिसरात चळवळीची नवचैतन्याने जागृती होणार असून आंबेडकरी अनुयायी तसेच सामाजिक न्यायप्रेमी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
(प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११



















