नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन
पुणे : व्यसनमुक्त समाजाची उभारणी आणि तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत तसेच मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धा यांचा समावेश असून, विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रबोधन करण्याचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. समाजातील तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अशा सर्जनशील माध्यमांचा प्रभावी वापर होईल, असा विश्वास समाजकल्याण विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संचालक आणि प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयात या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन स्तरावर विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावरील अंतिम निवड प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून, विजेत्यांची नावे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पुणे येथे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमाबाबत माहिती देताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले की,
“नशा मुक्त भारत अभियानाचा उद्देश केवळ व्यसन विरोधी प्रचार करणे नसून, तरुणांमध्ये सकारात्मक जीवनमूल्यांची जाणीव निर्माण करणे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी मानसिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम होतील आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावतील.”
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११




















