पवना धरणात ७२ टक्के पाणी साठ्याची नोंद. धरणातून ४००क्युसेक्स विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पवनानगर : पवना धरणामधून दिनांक ५ जुलै२०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून नदी पात्रामध्ये ४००क्युसेक्स प्रमाणात नियंत्रित पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण सद्यस्थितीत ७२ टक्के भरलेले असून, पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर येवा होत आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
धरण प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा विसर्ग १५ जुलै पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गाचे प्रमाण कमी अथवा अधिक करण्यात येऊ शकते.
यासंदर्भात पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीतील पंप, शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजारे, जनावरे व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे
सखल भागातील नागरिकांनाही याची पूर्वसूचना देण्याचे आवाहन प्रशासनाने स्थानिक यंत्रणांना केले आहे. सर्वांनी योग्य ती सावधगिरी बाळगून प्रशासन व जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















