राहुल गांधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जीएसटी दरामध्ये सुधारणा – डॉ. विशाल वाळुंज
तळेगाव दाभाडे :
तळेगाव शहर युवक काँग्रेसच्या बैठकीत शहराध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि काँग्रेस पक्षाच्या दबावामुळे केंद्र सरकारला जीएसटी दरामध्ये सुधारणा करावी लागली.
ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच जीएसटीच्या जटिल रचनेवर टीका केली होती. त्यांनी याला “गब्बर सिंग टॅक्स” असे संबोधत छोटे व मध्यम उद्योग (MSME) तसेच व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत आवाज उठवला. २०२१ मध्ये तामिळनाडूतील उद्योजकांशी संवाद साधताना त्यांनी “एकच किमान कर” अशी संकल्पना मांडली होती. पाच करस्लॅबमुळे निर्माण होणारी गुंतागुंत आणि छोट्या व्यापाऱ्यांवरील परिणाम याबद्दलही त्यांनी सातत्याने भाष्य केले. आज झालेली सुधारणा म्हणजे राहुल गांधींच्या दृष्टिकोनाला मिळालेली पुष्टी आहे, असे प्रतिपादन डॉ. वाळुंज यांनी केले.
यावेळी युवा नेते सम्राट कडोलकर यांनी सांगितले की, जुन्या जीएसटी धोरणामुळे लघु व मध्यम उद्योग मोठ्या अडचणीत सापडले, अनेकांची रोजीरोटी गेली, तर मोठ्या उद्योगांना मात्र फायदा झाला. देशातील बेरोजगारीचे मूळ जीएसटीतच होते. उशिरा का होईना, पण आता केंद्र सरकारने जीएसटी लोकाभिमुख व व्यवसायस्नेही करणे आवश्यक आहे. छोटे व्यापारी, शेतकरी व सामान्य जनतेला दिलासा मिळेल अशा सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्ष यासाठी सतत लढत राहील, असेही कडोलकर यांनी नमूद केले.
बैठकीस अॅड. राम शहाणे, डॉ. विशाल वाळुंज, अभिषेक गोडांबे, प्रतीक बोर्डे, निनाद हरपुडे, विक्रांत वाळुंज, यतीश रेडे, हर्षद चव्हाण, स्वप्निल साळवे, सागर वाळुंज, हर्षद उबाळे, अमित मोकाशी, नफीस खान, गणेश कवडे, राहुल फरांदे, संभाजी रेडे, रंगराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११






















