लोणावळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
लोणावळा : पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळा-खंडाळा या शहरांमधून जाणाऱ्या मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने मनशक्ती ते खंडाळा दरम्यान अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असून, शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी लोणावळा शहर पोलीस व खंडाळा महामार्ग पोलीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तथापि, स्थानिक नागरिकांच्या मते, पोलिसांच्या उपस्थितीतच अवजड वाहने शहरातून धावताना दिसतात. काही वाहनचालकांना कथितपणे आर्थिक तडजोडीच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्यांमार्गे जाण्याची परवानगी दिली जाते, अशी चर्चा आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे.

लोणावळा आणि खंडाळा येथील नागरिकांनी यापूर्वीच वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या विरोधात आंदोलन केले होते. गवळीवाडा नाका, खंडाळा बाजारपेठ आणि मनशक्ती परिसरात रस्ते कायमच कोंडीत अडकलेले दिसत होते. नागरिकांनी महामार्ग रोखून प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या आंदोलनानंतरच जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश लागू झाला होता, मात्र त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप प्रभावी होताना दिसत नाही.
दररोज हजारो पर्यटक लोणावळा-खंडाळा येथे ये-जा करतात. अशावेळी अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक केवळ स्थानिक रहिवाशांसाठीच नव्हे, तर पर्यटकांसाठीही धोका निर्माण करते. रस्त्यांवरील कोंडीमुळे पर्यटकांचा अनुभव बिघडतो आणि शहराची पर्यटनस्थळ म्हणून असलेली प्रतिमा मलिन होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अवजड वाहनांमुळे शहरातील रस्ते झपाट्याने खराब होत आहेत, तर अपघातांचा धोका वाढला आहे. शाळा, कार्यालये, दवाखाने याठिकाणी वेळेत पोहोचणे अवघड झाले आहे. “आदेश आहे पण अंमलबजावणी नाही, अशा परिस्थितीत प्रशासनाच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते,” असा सूर नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये ऐकू येतो.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, या बंदीचे उद्दिष्ट नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे. मात्र, आदेशाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास, नागरिकांनी पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नागरिकांच्या अपेक्षेनुसार, लोणावळा व खंडाळा पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने कडक कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करा व्यात, अशी मागणी वाढत आहे.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. 9921807011)




















