लोहगड शिवप्रेमींचे शिवतीर्थ व्हावे!
भाजे (ता. मावळ): किल्ले लोहगडला नुकताच युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा मान मिळाल्याने या ऐतिहासिक दुर्गाची कीर्ती आता जगभर पसरली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि गडाची निसर्गरम्यता अनुभवण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने लोहगडाकडे आकर्षित होत आहेत.

लोहगड आणि विसापूर हे मावळ तालुक्यातील दोन प्रमुख पर्यटन केंद्र ठरले असून, लोहगडावर गेल्या काही वर्षांत पुरातत्त्व विभागाने अनेक सुधारणा केल्या आहेत. गडावरील बुरुज, तटबंदी, पायऱ्या आणि पाचही दरवाजे दुरुस्त करण्यात आले आहेत. विशेषतः गणेश दरवाजा आणि हनुमान दरवाजाला ऐतिहासिक शैलीतील नव्याने भव्य दरवाजे बसविण्यात आले आहेत. गडावरील लक्ष्मी कोठी, विंचू कडा, सोळा कोन तलाव यांसारख्या स्थळांमुळे पर्यटकांचे आकर्षण आणखी वाढले आहे.
गडावरून समोर विसापूर किल्ला, पवना धरण, तुंग आणि तिकोना किल्ले तसेच सभोवतालचे हिरवेगार जंगल दिसते — त्यामुळे लोहगडाचे सौंदर्य अनोखे भासते.

जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर येथील हॉटेल, लॉजिंग, गाइडिंग आणि पर्यटनसंबंधित व्यवसायांना मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक युवकांना रोजगाराचे नवे मार्ग खुले झाले आहेत. मात्र, वाढत्या पर्यटनामुळे गडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिकता जपण्याची जबाबदारी देखील सर्व मावळवासीयांची असल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे.
दारूबंदी, वृक्षसंवर्धन आणि मूलभूत सुविधांची मागणी
लोहगड परिसरात शिस्तबद्ध पर्यटन होण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची आवश्यकता आहे.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड-विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, मार्गदर्शक संदीप गाडे, तसेच कार्यकर्ते बसप्पा भंडारी, सचिन निंबाळकर, गणेश उंडे, अमोल गोरे, अनिकेत आंबेकर, अजय मयेकर, चेतन जोशी, ओमकार मेढी, सिद्धेश जाधव आदींनी पुढील मागण्या केल्या आहेत
गड परिसरात पूर्ण दारूबंदी लागू करावी, तसेच अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. फार्महाऊसच्या नावाखाली होणारी वृक्षतोड थांबवावी आणि पर्यावरणाचे संतुलन राखावे. पुरातत्त्व विभागाने गडावर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची व्यवस्था तातडीने करावी.
‘लोहगड शिवतीर्थ व्हावा!’ — सचिन टेकवडे यांचे आवाहन
मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी सांगितले की, “लोहगड पायथ्याशी शिवसृष्टी उभी राहिली पाहिजे. जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना येथे छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांचे चारित्र्य आणि पराक्रम समजावून सांगणारे केंद्र उभारल्यास या भूमीचे खरे पावित्र्य टिकून राहील. किल्ले हे केवळ मौजमजेची ठिकाणे नसून, आजही येथे शिवरायांचे अस्तित्व जाणवते — ही जाणीव पर्यटकांना व्हावी. म्हणूनच लोहगड ‘शिवतीर्थ’ व्हावा ही सर्व शिवप्रेमींची मनापासूनची इच्छा आहे.”
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)




















