मावळ मधील विसापूर किल्ला परिसरात वाट चुकलेल्या तीन पर्यटकांना शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश
लोणावळा : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरामध्ये पाऊस व धुके यामुळे वाट चुकल्याने भरकटलेल्या तीन पर्यटकांना शोधून सुखरूपपणे त्यांची सुटका करण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आले आहे. ही घटना गुरुवारी दिनांक १०जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली होती. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना शिवदुर्ग पथकाने शोधत मळवली रेल्वे स्थानक येथे सुखरूप सोडले. या तीनही पर्यटकांनी शिवदुर्ग रेस्क्यू पथकाचे आभार मानली आहे.
ओजस प्रसाद फडके (वय–१८), ईशान श्रीराम जोशी (वय १८) व आयुष प्रसाद कलबंडे (वय १८. सर्व रा. पुणे) हे लोणावळा ग्रामीण परिसरातील लोहगड विसापूर किल्ला परिसरामध्ये फिरायला आले होते. विसापूर किल्ला परिसरामध्ये फिरत असताना ते सायंकाळी रस्ता चुकल्यामुळे भरकटले गेले. आपण रस्ता चुकून जंगलात जात असल्याचे त्यांना समजताच त्यांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाशी त्यांनी संपर्क साधत आपण विसापूर किल्ला येथे चुकलो असल्याची माहिती दिली. ही माहिती समजताच सागर कुंभार, राहुल वाघमारे, विशाल शिंदे यांनी त्यांचे लोकेशन घेत त्यांच्या पर्यंत पोहोचत त्यांना सुखरूपपणे खाली आणले. मळवली रेल्वे स्थानक येथे त्यांना सुखरूप सोडण्यात आले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















