राज्यात १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया निश्चित करण्यात आली असून, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर २२ जानेवारी २०२६ रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारांना २७ जानेवारी २०२६ रोजी अर्ज माघारी घेण्याची संधी देण्यात येणार असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
यानंतर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निवडणूक खर्चाच्या मर्यादाही निश्चित करण्यात आल्या असून, जिल्हा परिषद सदस्यांसाठी कमाल खर्च मर्यादा ९ लाख रुपये तर पंचायत समिती सदस्यांसाठी ६ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी या मर्यादेतच प्रचार व इतर निवडणूक खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. खर्चाच्या नोंदी ठेवणे आणि त्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही कार्यरत राहणार आहे.
या निवडणुकांमुळे संबंधित जिल्ह्यांतील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचार रणनीती आखण्यापर्यंत हालचाली वाढताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील सत्तेचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असल्याने, यंदाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.




















