मावळ तालुका भाजपा किसान मोर्चाची मागणी.पवना जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा.तहसिलदारांना दिले निवेदन
वडगाव : पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला बंदिस्त पाईपलाईने पाणीपुरवठा करण्याच्या बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पाला मावळातील शेतकऱ्यांचा अजूनही विरोध कायम असून, हा प्रकल्प रद्द करावा व सातबारा उताऱ्यावर असलेले संपादनाचे शेरे काढून टाकावे, अशी मागणी मावळ तालुका भाजप किसान मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.पवना जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नागरीकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेचे नियोजन केले होते.
पंरतु या प्रकल्पाला मावळ तालुक्यातील शेतक-यांचा तिव्र विरोध होता व तो आजही कायम आहे. पवना बंद जलवाहिनी योजनेला विरोध करण्यासाठी मावळ तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी ऑगस्ट सन २०११ मध्ये मोठे आंदोलन केले. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागून तीन शेतक-यांचा दुदैवी मृत्यू झाला होता तर काही आंदोलन शेतकरी जखमी झाले होते.यानंतर पवना बंदिस्त जलवाहिनी योजना कायमस्वरूपी रद्द करावी, अशी मावळ तालुक्यातील शेतक-यांची मागणी आहे.
तसेच, बाधीत शेतक-यांच्या ७/१२ उता-यांवर निगडी जलशुध्दीकरण केंद्र बंद पाईपलाईन करिता संपादित, असे शेरे आजही आहेत. त्यामुळे त्या शेतक-यांना त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे वैयक्तीक काम करता येत नाही अथवा शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. म्हणुन शासन स्तरावर संपादनाचे शेरे काढून टाकण्यासाठी योग्य ते आदेश व कार्यवाही होणे गरजेचे आहे. याबाबत योग्य ते आदेश व्हावेत व आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना भाजप किसान मोचाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष धामणकर, तालुकाध्यक्ष सूर्यकांत सोरटे, किसान संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार, विलास दळवी, गुलाबराव घारे, चंद्रकांत ठोंबरे, भरत ठोंबरे, चिंधू म्हस्के, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















