
लाखो नागरिक, मोजकीच स्वच्छतागृहे; तळेगाव दाभाडेत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जनआक्रोश
तळेगाव दाभाडे: सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आणि झपाट्याने विस्तारत असलेले तळेगाव दाभाडे शहर आज मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जात आहे. लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत अपुरी असून, त्यामुळे महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.


भेगडे तालीम चौक, चावडी चौक, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक आणि तळेगाव रेल्वे स्टेशन परिसरात असलेले स्वच्छतागृहे ही शहरातील एकमेव व्यवस्था आहे. मात्र त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. अनेक ठिकाणी दुर्गंधी, पाण्याचा अभाव, आणि अस्वच्छता यामुळे नागरिक तिकडे जाणे टाळत आहेत. ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे फलक दिसतात, पण प्रत्यक्षात स्वच्छतेचा मागमूसही नाही.


खळदे आळी येथील शासकीय स्वच्छतागृह दिवसाढवळ्या जमीनदोस्त झाल्याची घटना अधिकच गंभीर आहे. हा प्रकार कोणी केला, कोणाच्या परवानगीने केला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. नगरपरिषद प्रशासनाची यावरची शांतता संशयास्पद असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.


राजकीय पातळीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काही वर्षांपूर्वी आमदार व खासदारांनी नव्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची आश्वासने दिली होती. मात्र ती आश्वासने केवळ निवडणूक भाषणांपुरतीच मर्यादित राहिल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिजामाता चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्वच्छतागृहाला दोन वर्षांपासून टाळे लागलेले असून, व्यापारी आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे(पाटील) या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील का? की ही समस्या देखील फाईलमध्येच धूळ खात राहणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. विकासाच्या गगनभेदी घोषणा नकोत; सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा तरी मिळाव्यात, हीच तळेगावकरांची रास्त मागणी आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























