

माती वाहतुकीचा उन्माद! नाणे गावातील रस्ते मृत्यूच्या सापळ्यात, नागरिकांचे हाल
कामशेत : मावळ तालुक्यातील नाणे गावात माती वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून, यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भरधाव वेगाने गावातून ये-जा करणाऱ्या या गाड्यांमुळे रस्त्यांवर सर्वत्र माती साचली असून, संपूर्ण परिसर अपघातप्रवण बनला आहे. गावातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही मातीचा थर पसरल्याने रस्ते घसरडे झाले असून, वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.


विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे अनेक वेळा वाहनांचे संतुलन बिघडत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासन मात्र अद्याप मौन बाळगून असल्याचे चित्र आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि पादचारी यांना या मातीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


दरम्यान, माती वाहतूक करणाऱ्या गाड्या बेकायदेशीरपणे माती चोरी करून नेत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परवानगीशिवाय माती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याने शासनाच्या नियमांना सर्रास पायदळी तुडवले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. गाड्यांवर कोणतेही संरक्षण कवच नसल्याने माती रस्त्यावर पडत असून धुळीचे लोट हवेत पसरत आहेत.


याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. “रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन माती वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणावे, दोषींवर कारवाई करावी तसेच रस्त्यांची त्वरित स्वच्छता करावी, अशी जोरदार मागणी नाणे गावातील संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















