ऑक्टोबरपासून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवेत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २५०० रुपये
मुंबई : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात तब्बल १००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा १५०० ऐवजी २५०० रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. वाढीव मदत ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार असून नोव्हेंबर महिन्यापासून वाढीव रकमेचे वाटप प्रत्यक्ष सुरू होईल.
दिव्यांगांसाठी मोठा दिलासा
आतापर्यंत या योजनांमधून निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये दिले जात होते. वाढीव रकमेचा निर्णय झाल्याने दिव्यांगांना आता दरमहा २५०० रुपयांचा थेट आर्थिक आधार मिळणार आहे. महागाईच्या काळात शासनाने दिलेला हा दिलासा त्यांच्या उपजीविकेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
योजनांचा उद्देश
राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत –
निराधार पुरुष व महिला
विधवा महिला
अनाथ मुले
विविध प्रवर्गातील दिव्यांग
यांना थेट आर्थिक मदत दिली जाते. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही प्रामुख्याने वृद्ध, गरजू व निराधार व्यक्तींना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. शासनाचा उद्देश हा केवळ अर्थसहाय्य पुरवणे नसून, गरजू व असहाय्य नागरिकांना सामाजिक सुरक्षा व मानसिक आधार देणे हा आहे.
दिव्यांगांचा समाधानाचा श्वास
सरकारच्या या निर्णयाचे दिव्यांग लाभार्थ्यांनी स्वागत केले आहे. दरमहा २५०० रुपयांच्या मदतीमुळे त्यांना उपचार, औषधे व दैनंदिन खर्च भागविण्यास मोठी मदत होणार आहे. “महागाईच्या काळात सरकारकडून मिळालेला हा दिलासा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,” अशी भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
समाजातील सर्वात वंचित घटकांसाठी आधार
निराधार, विधवा, वृद्ध व दिव्यांग या समाजातील सर्वात दुर्बल घटकांना शासनाच्या या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या या वाढीव अर्थसहाय्यामुळे हजारो कुटुंबांना जगण्याचा थोडा अधिक आधार मिळणार आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)




















