
कामशेतच्या जलशुद्धीकरण संयंत्रावर प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांचा आरोप – “पाण्याचा हिशेब नाही, कोट्यवधींचा गैरवापर
कामशेत:मावळ तालुक्यातील कामशेत येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “गावाला शुद्ध पाणी देणारे हे संयंत्रच रामभरोसे चालू आहे; लाखोंचा नव्हे तर कोट्यवधींचा भ्रष्टाचार येथे झाला आहे,” असा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. अनेक दिवसांपासून पाण्याची दूषित गुणवत्ता, अनियमित पुरवठा आणि वारंवार खंडित होणारी यंत्रणा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ग्रामस्थ स्पष्टपणे सांगतात—“पैसा खर्च झाला कुठे आणि पाणी मिळते कुठले?”


कामशेत जलशुद्धीकरण संयंत्रासाठी गेल्या काही वर्षांत मोठा निधी मंजूर झाला. कागदोपत्री अत्याधुनिक यंत्रणा, प्रगत फिल्टरेशन व्यवस्था आणि अखंडित पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट दिसते. ग्रामस्थांच्या मते, मशीनरीची नियमित देखभाल होत नाही. काही उपकरणे तर कार्यरतच नसल्याचा आरोप आहे. परिणामी शुद्ध पाणी मिळण्याऐवजी पाण्यात वास, गढूळपणा आणि कधी कधी गाळ आढळतो.
ग्रामस्थांच्या प्रतिनिधीमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे तक्रारही दाखल केली आहे. “गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाची चौकशी व्हायलाच हवी,” अशी मागणी त्यांनी केली. कामशेतमधील अनेक महिलांनी तर रोज पाण्यासाठी होणारी धावपळ, अनियमित टँकर पुरवठा आणि वाढते खर्च याबाबत जोरदार नाराजी व्यक्त केली. “पाणी शुद्ध करण्यासाठीच सरकारकडून पैसा येतो. पण आम्हाला मिळते ते केवळ आश्वासन,” असा त्यांचा संताप आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मात्र आरोप फेटाळण्यात येत आहेत. “संयंत्र व्यवस्थित कार्यरत असून काही किरकोळ तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर केल्या जात आहेत,” असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. तरीही ग्रामस्थांना हा दावा मान्य नाही. “जर सर्व काही सुरळीत असेल तर पाणी का दूषित येते? जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा प्रत्युत्तर स्वर गावभर ऐकू येतो.


संपूर्ण घडामोडीवर आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी मागितल्याप्रमाणे सखोल चौकशी झाली तर नेमके गणित उघडकीस येण्याची अपेक्षा आहे. कामशेतमधील पाणीप्रश्न हा केवळ सुविधा किंवा तांत्रिक अडचणींचा मुद्दा नाही, तर पारदर्शकतेचा आणि जनजीवनाशी निगडित अधिकारांचा प्रश्नही आहे. एकीकडे ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’ची गंगा वाहतेय, तर दुसरीकडे कामशेतमध्ये पाण्याचा घोट मिळवणेही कठीण झाल्याचे चित्र आहे.
ग्रामस्थांचा स्पष्ट इशारा—प्रशासन जागे झाले तर ठीक, अन्यथा मोठा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















