
जुना पुणे–मुंबई महामार्ग धोक्याच्या वळणावर; अपघात रोखण्यासाठी कामशेत पोलिसांचे एमएसआरडीसी ला साकडे
कामशेत : अहिरवडे फाटा ते मुंढावरे दरम्यान असलेल्या जुना पुणे–मुंबई महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गाची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक सुधारणा व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कामशेत पोलिसांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) लेखी स्वरूपात केली आहे.


कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा जुना महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. लोणावळा, खंडाळा, पवनानगर, लोहगड, तुंगी आदी पर्यटनस्थळे तसेच एकवीरा देवी मंदिर, देहू, आळंदी यांसारख्या धार्मिक स्थळांकडे जाण्यासाठी हजारो पर्यटक व भाविक याच मार्गाचा वापर करतात. त्याचबरोबर तळेगाव व चाकण एमआयडीसीकडे जाणारी जड मालवाहतूक वाहने मुंबईकडे जाण्यासाठी हा मार्ग निवडत असल्याने दिवसरात्र मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. वाढती वाहतूक, अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि अपुऱ्या सुविधा यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे.


विशेषतः खामशेत ते संदीप हॉटेल दरम्यान रात्रीच्या वेळी वाहन बिघाडाच्या घटनांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. या परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे घाट परिसरात रस्त्याच्या मध्यभागी स्ट्रीट लाईट बसवाव्यात, खामशेत घाटात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.


खामशेत घाट ते कामशेत उड्डाणपुल दरम्यान तसेच आसपासच्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, रिफ्लेक्टर, दिशादर्शक सूचना फलक व वेगमर्यादा दर्शविणारे फलक उभारण्याची आवश्यकता पोलिसांनी अधोरेखित केली आहे. पाथरगाव व खामशेत घाट परिसरातील तीव्र उतार आणि अपघातप्रवण वळणांवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन चलन नोंदणीसाठी कॅमेरे बसवावेत, तसेच किमान सहा फूट उंचीचे रोलिंग बॅरिगेट उभारावेत, अशा उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे–मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण कमी करण्यासाठी एमएसआरडीसीमार्फत कारवाई सुरू असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कामशेत शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे, सम-विषम पार्किंग व्यवस्था आणि शहरात प्रवेश करताना एकेरी वाहतूक लागू करण्यासारख्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

याबाबत कामशेतचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले की, “नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी जुना पुणे–मुंबई महामार्गावर तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. एमएसआरडीसी ला सुचवलेल्या उपाययोजना वेळेत राबवल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















