
पवन मावळ, नाणे मावळ आणि आंदर मावळ विभागात रस्ते नव्हे तर खड्ड्यांची खाई; प्रशासन झोपेत
मावळ : मावळ तालुका म्हणजे पुणे जिल्ह्याचा डोंगरमाथ्यावरील मोती पण आज या मोत्यावर धूळ, चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. पवन मावळ, नाणे मावळ आणि आंदर मावळ विभागात रस्त्यांची अवस्था इतकी भीषण झाली आहे की, रस्ता ओळखावा की दरी, हा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा आहे.


पावसाळा संपूनही रस्त्यांवरून पाणी नाही गेलं, पण माती आणि डांबर मात्र पूर्णपणे वाहून गेलं आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांत रस्ते याचं उत्तर आता प्रशासनाने द्यायचं आहे! ग्रामीण भागातील लोकांचा जीव अक्षरशः धोक्यात आहे. शाळकरी मुले सकाळी शाळेकडे जाताना डगमगत जातात, शेतकरी ट्रॅक्टरसकट अडकतात, आणि रुग्णवाहिका आल्यास ती वेळेत रुग्णालयात पोहोचेल याची शाश्वतीच नाही.
प्रशासन मात्र नेहमीच्या थाटात बैठकींच्या गप्पांमध्ये आणि निवेदनांच्या फोटोसेशनमध्ये व्यस्त. दरवर्षी कोट्यवधींच्या निधीचा रस्ता कोठे जातोय, हा प्रश्न नागरिक विचारतात आणि उत्तर मात्र कुणाकडेच नाही. विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर या खड्ड्यांवरून फिरकले तरी नाहीत.


रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या असतात. त्या जर बंद पडल्या, तर तालुक्याचा विकास हा केवळ कागदावरच राहतो. मावळचा शेतकरी बाजारात पोहोचू शकत नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतात, आणि पर्यटनही या दुर्दशेने पांगळं झालं आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा हा कळस आहे जनतेचा संयम आता संपत चाललाय. “जर आमचे रस्ते बनवले नाहीत, तर आम्ही आंदोलनाच्या रस्त्यावर उतरणार,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


मावळकरांना आता आश्वासनं नकोत, कृती हवी आहे. खड्ड्यांवर डांबर नव्हे, तर उत्तरदायित्वाचं आवरण हवं आहे. अन्यथा, येत्या निवडणुकीत हेच खड्डे सत्ताधाऱ्यांच्या पराभवाचं कारण ठरतील हा इशारा वेळेत समजून घ्यावा.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















