मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व १५ जागांवर दणदणीत विजय
“हा विजय माझ्या अजित दादांना श्रद्धांजली” – आमदार सुनील शेळके
मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० अशा एकूण सर्व १५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा विजय आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या राजकीय करिष्म्याचा परिपाक असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निकालानंतर प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके म्हणाले,
“मावळ तालुक्यातील जनतेने दिलेला हा कौल माझ्या अजित दादांना अर्पण केलेली श्रद्धांजली आहे. त्यांनी मावळसाठी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करण्याचा हा जनतेचा विश्वास आहे.”
तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत झालेली विकासकामे, सर्वसामान्यांशी थेट संवाद, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि संघटनात्मक बांधणी याचा मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत झाला. विशेषतः महिला, युवक व जेष्ठ नागरिक मतदारांचा प्रतिसाद लक्षणीय ठरला.
विकासाच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि अडचणीच्या काळात जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका आमदार शेळके यांनी सातत्याने घेतल्याने मतदारांचा विश्वास अधिक दृढ झाला, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
या विजयामुळे मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक बळकट झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
एकूणच, मावळ तालुक्यातील हा निवडणूक निकाल केवळ राजकीय यश न ठरता, अजित दादांच्या कार्याला दिलेली भावनिक श्रद्धांजली आणि त्यांच्या विचारांना मिळालेली लोकमान्यता असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.




















