लोणावळा नगर परिषदेमध्ये अधिकारीच नसल्याने नागरिकांची होतेय गैरसोय.गटनेते देविदास कडू यांचा संताप
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचा कारभार सध्या विस्कळीत झाला आहे. नगरपरिषद कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी कोणीच नसल्याची तक्रार माजी नगरसेवक आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देविदास कडू यांनी केली आहे. “नगरपरिषदेला सध्या कोणी वालीच उरलेला नाही का?” असा सवाल त्यांनी थेट प्रशासनाला विचारला.2021 पासून नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त आहे.
मात्र, ना प्रशासक उपलब्ध आहेत, ना विभागप्रमुख. पावसाळ्यात लाईट, पाणी आणि ड्रेनेजसारख्या तातडीच्या समस्या नागरिकांना भेडसावत असताना, नगरपरिषद कार्यालयात अधिकारीच हजर नसल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत, देविदास कडू पुढे म्हणाले, २३जुलै२०२५ रोजी उच्च न्यायालयाने लोणावळा नगरपरिषदेस नवीन विकास आराखडा तयार करणे, अतिक्रमण काढणे, आणि भौतिक सुविधा उभारण्याबाबत निर्देश दिले.
त्या पार्श्वभूमीवर मी नगरपरिषदेत माहिती घेण्यासाठी गेलो होतो. मात्र सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेचार या वेळेत देखील एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता.या अनास्थेमुळे प्रशासनाची जबाबदारी शून्यवत झाली असून, नागरिकांचे प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत.
जर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर जनहितासाठी अधिक तीव्र भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देखील देविदास कडू यांनी दिला आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















